सहाव्या दिवशी कृष्ण–रुक्मिणी विवाह सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरी सध्या भक्तिरसात पूर्णपणे न्हाऊन निघाली असून, समस्त ग्रामवासीयांच्या वतीने आयोजित अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताह मोठ्या उत्साहात व भक्तीभावात सुरू आहे.
दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत श्री. तात्याजी लटारी जिवतोडे यांच्या शेतात, जिल्हा परिषद शाळेसमोर हा भव्य धार्मिक सोहळा पार पडत आहे.
कथा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी परमपूज्य धर्माचार्य प.पू. श्री. कृष्णकुमार पाण्डेय महाराज (श्रीक्षेत्र काशी, वाराणसी) यांच्या सुमधुर वाणीतील कथाकथनाने वातावरण भक्तिमय झाले.
यावेळी भगवान श्रीकृष्ण व रुक्मिणी विवाह प्रसंग अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर करण्यात आला. श्रीकृष्ण व रुक्मिणीच्या वेशभूषेत बोबडे दाम्पत्याने साकारलेला विवाह सोहळा पाहून उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.कथा सप्ताहादरम्यान विविध वारकरी मंडळांचे हरिपाठ, भजन, किर्तन, भारूड तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी ६.०० ते ७.०० व सायंकाळी ६.०० ते ६.३० या वेळेत सामूहिक प्रार्थना होत असून, सायंकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत विविध भजन मंडळांचे कार्यक्रम रंगतदारपणे सादर केले जात आहेत. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घेत आहेत.आज बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या दि. २२ जानेवारी रोजी भव्य ग्रंथ शोभायात्रा व भजनाचा कार्यक्रम पार पडणार असून, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत गोपालकाला व किर्तन सोहळा होणार आहे.या पवित्र, भक्तिमय व आध्यात्मिक सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समस्त करणवाडी ग्रामवासी यांनी केले आहे.
