महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून राज्य अद्याप सावरलेले नसताना त्यांच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर राजकारण करणे अतिशय अमानुष आहे आणि अशा विषयांवर आपण बोलणार नाही. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करत सध्याच्या दुःखद परिस्थितीत राजकीय चर्चा टाळण्याची गरज असल्याचे नमूद केले.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून, महाराष्ट्र अजूनही त्यांच्या जाण्याच्या दुःखातून सावरलेला नाही. अशा परिस्थितीत कोणी त्यांच्या नावावर राजकीय डावपेच खेळत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. तळागाळातील कार्यकर्तेसुद्धा रडत होते. अशा वेळी किमान 15 ते 20 दिवस तरी राजकीय चर्चा नको. त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषयांवर किंवा त्यांच्या कुटुंबातील निर्णयांवर बोलणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांनाही या विषयावर अनावश्यक चर्चा टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पवार कुटुंबीयांच्या दुःखाचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, प्रत्येक कुटुंबीयाच्या डोळ्यात अश्रू होते आणि वातावरण अत्यंत भावनिक होते. एका महिलेनं आपला पती गमावला आहे, कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. त्यांच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहेत आणि त्यावर कोण नेतृत्व करणार, कोण पदावर येणार यावर चर्चा करणं माणुसकीशून्य आहे. मंत्री असो किंवा आमदार असो, अशा विषयावर बोलणं अमानुष आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. परिस्थिती स्थिरस्थावर झाल्याशिवाय राजकीय चर्चांना फाटा देऊ नये, असा सल्ला त्यांनी सर्व नेत्यांना दिला. बारामती विमान अपघात प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी दोन अराजकीय मागण्या मांडल्याचे सांगितले. त्यांनी अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि नागरी विमान वाहतूक संचालन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. बारामती विमानतळावर रडार नव्हते, एटीसी नव्हते, आवश्यक यंत्रणा नव्हती. केवळ एअरस्ट्रीप होती आणि तिथे व्हीआयपी विमानं उतरायची. अशा ठिकाणी शरद पवार, अदानीसारखी व्यक्ती येत होती, याची जबाबदारी कोणाची? असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांचे विमान बराच वेळ आकाशात घिरट्या मारत होते, दृश्यमानता कमी होती, तरी लँडिंगचा संदेश कोणी दिला, अशी विचारणा त्यांनी केली. राऊत यांनी DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) च्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमान संचालनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा देशातील अनेक विमानतळांवर नसतील, तर DGCA काय करत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, गेल्या काही काळात अनेक विमान अपघात झाले असून त्यात जीवितहानी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रणालीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ही मागणी राजकीय नसून पूर्णपणे सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादांवर प्रेम असेल, तर त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या संजय राऊत यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पानभर जाहिराती देण्यात आल्याचे त्यांनी नमूद करत, केवळ जाहिराती देऊन श्रद्धांजली देण्याचा उपयोग नाही, असे म्हटले. भाजपनं दादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता आणि तो सिद्ध करू शकले नाहीत. पंतप्रधानांनीही हा आरोप केला होता. जर दादांवर प्रेम असेल, तर त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या, तीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी देखील त्यांनी केली. ही राजकीय मागणी नसून मानवी भावनेतून केलेली विनंती असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर निवडीच्या विलंबावरही नाराजी याचवेळी संजय राऊत यांनी मुंबई महापौर निवडीच्या विलंबावरही नाराजी व्यक्त केली. महापौर निवडीच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याचे सांगत, भाजप आणि शिंदे गटातील मतभेदांमुळे मनपा सत्तेचे वाटप अडकले असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक निवडून आले असूनही त्यांना काम सुरू करू दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षनेतेपदाबाबत नवा कायदा आणण्याची चर्चा सुरू असल्यावर टीका करत, हे महाराष्ट्राची बदनामी करणारे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे समर्थक असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
