वाटाण्याच्या अक्षदा!:केंद्रीय अर्थसंकल्पावरून अंबादास दानवेंचा घणाघात, म्हणाले- सबसिडीत कपात करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. या बजेटला वाटाण्याच्या अक्षदा असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत संपूर्ण अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी शेती, ग्रामीण विकास, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य तसेच महागाई आणि टॅक्स अशा सर्वच मुद्यांवर भाष्य करत टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी शेती आणि ग्रामीण विकास या विषयावर टीका करताना म्हटले की, देशाची 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना, एकूण बजेटमधील कृषी क्षेत्राचा वाटा गेल्या काही वर्षात 3.5 टक्के वरून 2.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. खतांवरील सबसिडीत 20 हजार कोटींची कपात करून सरकारने शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हेच का तुमचे शेतकरी प्रेम? असा खोचक सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. बेरोजगारीचा भयावह आकडा पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, देशात बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांच्या पार गेला आहे, पण बजेटमध्ये नवीन रोजगारासाठी ठोस तरतूद शून्य! गेल्या वर्षीच्या तुलनेत मनरेगा (MGNREGA) निधीत वाढ करण्याऐवजी कपात करण्यात आली आहे. तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी केवळ स्किलिंगच्या नावाखाली आकड्यांचा खेळ सुरू आहे. शिक्षण आणि आरोग्य (जीडीपीची टक्केवारी) ​विकसित भारताच्या गप्पा मारताना शिक्षण क्षेत्राला जीडीपीच्या 6 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात तो 3 टक्केच्या आतच रेंगाळतोय. आरोग्यासाठीची तरतूद केवळ 2.1 टक्के आहे. सामान्यांच्या जीवाशी खेळून कोणत्या पायाभूत सुविधा उभारताय? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. महागाई आणि टॅक्सचा बोजा ​पेट्रोल-डिझेलवरील करातून सरकारने लाखो कोटी कमावले, पण मध्यमवर्गीयांना टॅक्स स्लॅबमध्ये दिलेली सवलत केवळ 5-10 हजार रुपयांची आहे. महागाईचा दर 5.5 टक्के असताना ही सवलत म्हणजे जनतेची थट्टा असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. कर्ज आणि व्याज (देशाची आर्थिक स्थिती) आजच्या बजेटनुसार, सरकार आपल्या एकूण उत्पन्नातील 20 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा केवळ कर्जाचे व्याज भरण्यासाठी खर्च करत आहे. कर्जाचा डोंगर वाढत असताना ‘विकास’ फक्त कागदावरच दिसतोय. सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आणि मित्रांचे खिसे गरम! अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!