खरबडा गट ग्रामपंचायतीत लेखांकनाचा गोंधळ

२०२२ ते २०२६ पर्यंतच्या खर्चावर ग्रामस्थांचा सवाल, विशेष ग्रामसभेची मागणी

ज्ञानेश्वर आवारी झरी-जामणी,


झरी-जामणी तालुक्यातील गट ग्रामपंचायत खरबडा येथे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, ग्रामस्थांनी पंचायत समिती झरी येथील गट विकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी केली आहे.

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभा बैठकीत प्रभारी ग्रामविकास अधिकारी व सदस्य समिती ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर २९ जानेवारी २०२६ रोजी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत, मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीतही ग्रामपंचायतीच्या लेखांकनाबाबत संपूर्ण व स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर बैठकीदरम्यान कोणतेही मूळ खर्चाचे बिल, व्हाउचर अथवा संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी  कविता कुळमेथे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमध्ये अनियमितता व अपूर्ण कामे असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली आहे की वित्तीय वर्ष २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीतील ग्रामपंचायतीचे संपूर्ण वार्षिक लेखांकन सध्याचे ग्रामविकास अधिकारी श्री. प्रकाश बळीद व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत, ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेत सादर करण्यात यावे.सदर विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीतील सर्व विकासकामे, खर्चाचा तपशील, निधी वितरण तसेच सर्व मूळ बिले व कागदपत्रे ग्रामस्थांसमोर मांडण्यात यावीत, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहील व ग्रामस्थांचा विश्वास अबाधित राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.


  या निवेदनावर अतुल हिरामण पाटील, गणेश पेंदोर, सागर मच्छावार, अल्ताब सय्यद, तिरुपती मोरेवार, प्रविण राऊत, रोहित मोरेवार, सुरज चिक्राम, मणिकंठा मोरेवार, पंकज उइके, आदित्य मोरेवार, करण उरवते, रोहन शेडमाके, प्रशांत गेडाम,प्रथमेश कुंमरे, गणेश टेकाम, श्नीनिवास भोरेवार,प्रमोद मोरेवार,महेश येंबावार, सचिन मडकाम,संतोष नाग्रतवार यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

ग्रामस्थांनी पुढील ८ दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा आयोजित करून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली असून, पंचायत समिती प्रशासनाकडून आता काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Leave a Comment

error: Content is protected !!