सुरेश पाचभाई / मारेगाव
मारेगाव: कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 27 जानेवारी 2026 ते 02 फेब्रुवारी 2026 पर्यंत दत्तकग्राम मांगरूळ येथे आयोजित करण्यात आले.
शाश्वत विकासासाठी युवा: पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास हे शिर्षक साध्य करत सदर शिबीर नाविन्यपूर्ण उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. घनकचरा व्यवस्थापन, संविधान जनजागृती, जलसंवर्धन, महिला सक्षमीकरण , माझा कचरा, माझी जबाबदारी, अंधश्रद्धा जनजागृती निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, शासकीय कृषी योजना जनजागृती, प्रभातफेरी व पशुचिकित्सा शिबीर अशा विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग लक्षणीय ठरला.

या विशेष शिबिराचे उद्घाटन दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी संस्थेचे सचिव मा.श्री. महेंद्रकुमार बोथरा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नरेंद्रपाटील ठाकरे , प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर, मा. श्री. दिगंबर पाटील मस्की, सरपंच श्री. प्रमोद आत्राम, उपसरपंच छायाताई गोडे, मा. सौ.शितलताई पोटे, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा. श्री. नरेंद्र पाटील ठाकरे यांनी मांगरूळच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून श्रमदानाच्या माध्यमातून व विविध मान्यवरांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून समस्त गावकऱ्यांमध्ये जनजागृती कशी केली जावी यावर आपले सविस्तर मत व्यक्त केले तर प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी विद्यार्थी जीवनात रासेयोचे मूल्य जोपासत असताना जलसंधारणच्या माध्यमातून गावातील पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल यावर विद्यार्थ्यांशी व गावकऱ्यांशी चर्चा केली.
डॉ. राजेश चवरे यांच्या उपस्थित सर्व स्वयंसेवकांची विविध गटामध्ये विभागणी करून उपस्थित विद्यार्थ्यांनी या गटांना विविध समाजसुधारकांची नावे दिली गेली. तसेच अकोला येथे घेण्यात आलेल्या आव्हान शिबीर 2025-26 मध्ये महाविद्यालयाच्या 02 विद्यार्थिनी उत्कृष्ट कामगिरी करून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या चमुने प्रथम क्रमांक पटकवला यामुळे प्रिया मत्ते व आचल चौधरी यांचा सत्कार डॉ. चवरे सरांच्या हस्ते करण्यात आला.

समाजसुधारकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या दिवशी सामूहिक ध्यान, योगासने, प्रभात फेरी, सामूहिक प्रार्थना, चर्चासत्रे आणि श्रमदान या शिबिरातील दिनचर्याची रूपरेषा विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी बौद्धिक सत्रामध्ये डॉ. विभा घोडखांदे प्रा.डॉ. कुलकर्णी डॉ. शैलेश आत्राम व प्रा. अक्षय जेणेकर यांच्या उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याने श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.
तिसऱ्या दिवशी बौद्धिक सत्रामध्ये डॉ. रोहित वनकर यांनी हर घर संविधान याविषयावर आपला प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना डॉ. गजानन सोडणर यांनी संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावर आपले मत व्यक्त केले तसेच मंचावर उपस्थित डॉ. श्रीराम खाडे यांनी ग्रामीण क्षेत्रातील लोकांना कायद्यातील तरतुदी व संविधानाचे महत्व अधोरेखित केले.
चौथ्या दिवशी बौद्धिक सत्रामध्ये मा.श्री. गजानन कासावार यांनी भारताचा गौरवशाली इतिहास या विषयावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर उपस्थित डॉ. संतोष गायकवाड यांनी समाजसुधारणामध्ये युवकांची भूमिका काय असली पाहिजे तर डॉ. शैलेश कांबळे व प्रा. रुपेश वांढरे यांनी आजची शिक्षण व्यवस्था या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी प्रबोधनकार दिगंबर पाटील गाडगे यांनी समाज प्रबोधन पर लोकनाट्य व लोककला आधारित नकलांचा कार्यक्रम सादर करून गावकऱ्यांचे मनोरंजन केले.
पाचव्या दिवशी बौद्धिक सत्रामध्ये अमरावती येथील श्री. राम भक्तानी यांनी सहज योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याविषयावर तर डॉ. माधुरी ताणूरकर, यांनी तरुण पिढीतील ताणतणाव व व्यवस्थापन, प्रा.अस्मिता ढवस यांनी आरोग्य व सदृढ जीवन या विषयावर विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले. सायंकाळी श्री. विकास चिडे यांनी स्वच्छता, राष्ट्रसंताचे विचार व महिला सक्षमीकरण या विषयावर कीर्तनाच्या माध्यमातून अत्यंत बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सहाव्या दिवशी बौद्धिक सत्रामध्ये वॉटर कप स्पर्धा विजेता श्री. रुपेश रेंघे यांनी जलसंधारण: चला जगूया आपुल्या माणुसकीला हा प्रभावी कार्यक्रम घेण्यात आला तर प्रा. माकडे यांनी जलसंवर्धन व वृक्षारोपण ह्या विषयावर विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले तसेच पीस फॉउंडेशन, चंद्रपूर येथील चमुने ग्रामीण समुदायांना शिक्षण, कौशल्य विकास आणि शाश्वत उपजीविका प्रदान करून, स्वावलंबन, प्रतिष्ठा आणि सकारात्मक बदल घडवून आणून सक्षम बनवण्यासाठी चित्रफितीच्या माध्यमातून माहिती दिली.
तसेच सायंकाळी मारेगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी यांनी ग्रामीण जीवनातील समस्या व उपाय यावर अतिशय मनोरंजनात्मक हसा आणि हसवा हा कार्यक्रम सादर केला व विद्यार्थ्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकनृत्य, नाटीका या मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आला व गावकऱ्याचा उदंड प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या माध्यमातून माझा कचरा, माझी जबाबदारी व खाजगी शाळेकडे वाढता कल यावर आधारित प्रश्नावली तयार करून गावात सर्वेक्षण करण्यात आले व पाणी आडवा पाणी जिरवा च्या माध्यमातून श्रमदानाची कामे करण्यात आली.
सातव्या दिवशी मांगरूळ येथील नवरगावकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यानंतर या शिबिराचा समारोप संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून शिस्त, व्यक्तिमत्व विकास व राष्ट्रसेवा यांचे अनुकरण करून यापुढे अधिक प्रभावी शिबीर मांगरूळ येथे घेतला जाईल असे अध्यक्षांनी विश्वास व्यक्त केला.
तसेच प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना सांगितले की स्वच्छता व जलसंधारणाच्या माध्यमातून गावाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी मंचावर उपस्थित डॉ. श्रीराम खाडे, अमोल गुघुल व शितलताई पोटे आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मुलांमधून वेदांत सिडाणा तर मुलींमधून राजश्री मेश्राम तर सांस्कृतिक कार्यक्रमातून आचल चौधरी, उत्कृष्ट ग्रुप मधून महात्मा फुले ग्रुप यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.शिबिराप्रसंगी संगाबा अमरावती विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. निलेश कडू सरांची भेट अत्यंत प्रभावी ठरली व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिबिराचे कौतुक केले.
या शिबिराकरता महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिल अडसरे प्रा. अश्विनी जाधव, प्रा. प्रवीण पोटे यांनी अथक परिश्रम घेतले. सोबतच डॉ. नितेश राऊत सरांनी नित्यनियमाने योगासन शिबीर घेतले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रिया मत्ते व विद्यार्थ्यांनी शिबिराच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून व समस्त मांगरूळ ग्रामवाशी, महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी सहकार्य करून शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले.
