उपअधीक्षक व भूमापक ५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटकेत
रितेश क्षीरसागर | यवतमाळ
यवतमाळ, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिग्रस येथील भूमीअभिलेख कार्यालयात फेरफार नोंदणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून दोन लोकसेवकांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
या कारवाईत सखाराम नरसिंग पवार (वय ४९), उपअधीक्षक, भूमीअभिलेख कार्यालय, दिग्रस आणि आशिष काशिनाथ शेलोकर (वय ४७), नझुल परिरक्षण भूमापक, दिग्रस यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार व त्यांच्या पतीच्या नावे केली होती. या मालमत्तेची फेरफार नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भूमीअभिलेख कार्यालयात सादर करण्यात आली होती. मात्र, संबंधित कामासाठी भूमापक आशिष शेलोकर यांनी उपअधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
फेरफार नोंदीसाठी एकूण ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार तक्रारदारांनी ACB कडे दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत शेलोकर यांनी ही रक्कम स्वतःसाठी व उपअधीक्षक पवार यांच्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानुसार ३ फेब्रुवारी रोजी ACB पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदारांकडून शेलोकर यांनी ५ हजार रुपये स्वीकारले. त्यातील २,५०० रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित २,५०० रुपये उपअधीक्षक पवार यांना देताच दोघांनाही उपअधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन घनवट व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी ACB यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB प्रशासनाने केले आहे.
