पर्यावरणपूरक होळीचा जागर; शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळात उत्साहपूर्ण कार्यक्रम

प्रतिनिधी : नितेश क्षीरसागर | कळंब

कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत दि. २ मार्च २०२६ (सोमवार) रोजी पर्यावरणपूरक होळी महोत्सव मोठ्या उत्साहात व सामाजिक जाणिवेने साजरा करण्यात आला. सणांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गप्रेमाची ठिणगी चेतवली.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका कु. शालू सदाफळे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण देशमुख उपस्थित होते.प्रमुख अतिथी प्रवीण देशमुख यांनी होळीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना पर्यावरण रक्षणाची आजची गरज अधोरेखित केली.

“होळी हा वसंत ऋतूचा प्रारंभ करणारा सण असून तो प्रेम, हर्ष आणि आनंद वाढवणारा असावा; कोणालाही हानी पोहोचवणारा नसावा,” असे ते म्हणाले. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा स्वीकार करावा, कचऱ्यापासून होळी पेटवून परिसर स्वच्छ ठेवावा आणि वृक्षलागवडीद्वारे निसर्गाची परतफेड करावी, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय भाषणात कु. शालू सदाफळे यांनी सण साजरा करताना सामाजिक जबाबदारी ओळखण्याचे आवाहन केले. “परिसरातील कचरा वेचून पर्यावरणपूरक होळी साजरी केल्यास पर्यावरणाची हानी टळू शकते. प्रत्येकाने निसर्गरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी मानली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्लास्टिकमुक्त होळी, नैसर्गिक रंगांचा वापर आणि वृक्षसंवर्धनाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतले. सणाच्या आनंदात सामाजिक भानाची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर होले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज शिवरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवम चांदोरे व कु. चंद्रभागा मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गसंवर्धनाची बीजे रुजवणारा हा कार्यक्रम सामाजिक जाणीव आणि संस्कारांचा सुंदर संगम ठरला.

Leave a Comment

error: Content is protected !!