गडचिरोलीत 7 जहाल नक्षल्यांचा खात्मा, प्रभाकर ठार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऑपरेशनचे कौतुक; काँग्रेसच्या राजकारणावरही टीका

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या देशाचे विभाजन झाले आहे. आज देखील काँग्रेस यातून सुधारलेले नाही. वारंवार ते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. यावर आमचे स्पष्ट शब्दात म्हणणे आहे की, कोणताही जात, धर्म न पाहता, सर्वांसाठी न्याय मिळायला हवा. मात्र तुष्टीकरण कोणासाठीही नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फटकारले आहे. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालन करण्याचं काम तिथल्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या देशांमध्ये जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी या देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, लोक त्यांना साथ देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांना दिलेला आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले… ते आजही तुष्टीकरण करत आहेत. आम्ही स्पष्टपणे म्हणतो की न्याय सर्वांसाठी आहे, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, पण तुष्टीकरण कोणासाठीही नाही. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी लढ्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. गडचिरोली पोलिसांच्या C-60 जवानांनी अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत राबवलेल्या मोहिमेमध्ये सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑपरेशनचे कौतुक करत C-60 जवानांचे आणि पोलिसांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले. या भागात यापूर्वी फारशा मोहिमा झालेल्या नव्हत्या. तीन दिवस सलग पोलिसांनी या जंगलात तळ ठोकून रणनीती आखली. दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवण्यात आले आणि त्यानंतर जोरदार चकमक झाली. नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकरचा खात्मा या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. तरीही पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या मोहिमेत सात नक्षलवादी ठार झाले असून त्यामध्ये नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचाही समावेश आहे. प्रभाकर हा कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी होता तसेच गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रभारी म्हणून तो कार्यरत होता. त्याच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने राज्य पोलिस दलाचे प्रयत्न या कारवाईनंतर राज्यातील नक्षलवादी ताकद आता फारच मर्यादित राहिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या बाजूने आता फक्त बोटावर मोजण्याइतके, म्हणजे तीन ते चार मोठे नक्षलवादी उरले आहेत. वेगाने नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने राज्य पोलिस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. C-60 जवानांच्या शौर्यामुळे आणि चिकाटीमुळे हे यश मिळाले असून यामुळे सामान्य नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एक पोलिस जवान शहीद या यशस्वी मोहिमेत दुर्दैवाने एक पोलिस जवान शहीद झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले की, बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केलेले असतानाही रणनीतीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू झाला. राज्य शासन शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 22 देशांतील राजनैतिक प्रतिनिधी विदर्भात दरम्यान, फडणवीस यांनी विदर्भातील विकासाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ उपक्रमाअंतर्गत 22 देशांतील राजनैतिक प्रतिनिधी विदर्भात आले होते. या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक संधी जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. केअर हॉस्पिटलचा नागपुरात 500 खाटांचा प्रकल्प उभारण्यासाठी एमओयू करण्यात आला असून सोलर मॉडेलमध्ये 10 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!