कोण आहेत मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे:सभागृहात चार माजी महापौरांचे आव्हान; म्हणाल्या- मुंबईची सेवक म्हणून काम करणार

देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपल्या महापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृत घोषणा केली. त्याचबरोबर उपमहापौरपदी शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांची निवड जाहीर झाली आहे. पुढील सव्वा वर्षे घाडी उपमहापौर म्हणून काम पाहणार आहेत. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्याने मुंबईची महापौर महिला असणार हे आधीच स्पष्ट झाले होते. भाजपमध्ये रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन नावांची जोरदार चर्चा होती. अखेरीस रितू तावडे यांनी बाजी मारली. मात्र महापौरपद मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. अनेक वर्षे मनपात सत्ता चालवलेल्या ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांचा त्यांना सभागृहात सामना करावा लागणार आहे. मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. या गटात मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या चार माजी महापौरांचा समावेश आहे. मनपाच्या कारभारातील प्रत्येक बाबीची सखोल माहिती असलेले हे नेते सभागृहात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रितू तावडे यांना अनुभवसंपन्न विरोधकांच्या प्रश्नांना आणि टीकेला समर्थपणे उत्तर द्यावे लागेल. महापौरपदी निवड झाल्यानंतर रितू तावडे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्ष जो निर्णय घेतो तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी सर्वांचे आभार मानते. महापौरपद मिळाले असले तरी मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. सभागृहाची गरिमा राखून सर्वांनी पक्षभेद विसरून मुंबईच्या हितासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोण आहेत रितू तावडे रितू तावडे या प्रभाग क्रमांक 132 मधील भाजपच्या नगरसेविका आहेत. त्या मुंबई महापालिकेत दोन वेळा निवडून आल्या आहेत. घाटकोपरमधील गुजराती बहुल भागात मराठी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले असून स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ईशान्य मुंबईतील भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा आहे. वीज दरवाढीविरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मनपातील कामकाजाची माहिती आणि प्रशासनातील अनुभव यामुळे त्यांना महापौरपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपने या निवडीद्वारे अनुभव आणि आक्रमक नेतृत्व यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या महापौरांसमोर अनुभवी विरोधक आता मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नव्या महापौरांसमोर अनुभवी विरोधक असणार आहेत. चार माजी महापौरांसह ठाकरे गटाचे नगरसेवक सभागृहात सक्रिय राहतील. या पार्श्वभूमीवर रितू तावडे यांची भूमिका, त्यांचा संयम आणि प्रशासनातील निर्णयक्षमता यांची खरी परीक्षा होणार आहे. मुंबईच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन त्यांनी केले असले तरी सभागृहातील राजकीय वातावरण किती सौहार्दपूर्ण राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!