केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासह मंदिर परिसरातील तब्बल 1447.95 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री उशिरा कोल्हापुरात आगमन, मान्यवरांकडून स्वागत शुक्रवारी रात्री उशिरा अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहा यांची मुक्कामाची व्यवस्था सर्किट हाऊसमध्ये करण्यात आली असून संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सपत्नीक अंबाबाईचे दर्शन, विधिवत पूजा शनिवारी सकाळी अमित शहा आपल्या पत्नींसह महालक्ष्मी मंदिर येथे दर्शन घेणार आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात ते विधिवत पूजा-अर्चा करणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. मंदिराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा दर्शवणारे माहिती फलकही लावण्यात आले आहेत. अमित शहा जवळपास एक तास मंदिर परिसरात राहून विविध कामांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 1447.95 कोटींच्या विकासकामांना हिरवा कंदील अमित शहा यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिर परिसरातील सुमारे 1447.95 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिरांचे संवर्धन, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, पर्यटनवृद्धीसाठी विविध पायाभूत सुविधा, यांसारख्या कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित राहणार आहेत. पोलिस परेड मैदानावर जाहीर सभा महालक्ष्मी मंदिरातील कार्यक्रमानंतर अमित शहा कोल्हापूर पोलीस परेड मैदानावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, राज्यातील राजकीय घडामोडी आणि केंद्र सरकारच्या योजनांबाबत ते भाष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, राज्यात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यामुळे शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात ‘ऑपरेशन टायगर’संदर्भातही चर्चा होण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इचलकरंजीत सहकार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यक्रम कोल्हापूरमधील कार्यक्रमानंतर अमित शहा इचलकरंजीकडे रवाना होणार आहेत. तेथे ते जनता सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, सहकारी साखर कारखान्याच्या विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन करतील. तसेच कल्लाप्पण्णा आवडे टेक्सटाइल पार्क येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील. इचलकरंजी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे वस्त्रोद्योग केंद्र असल्याने शहा यांच्या दौऱ्याकडे उद्योग क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. शहांना भेटण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अडवले दरम्यान, या दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घटना घडली. सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी कोल्हापूरकडे निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोलनाक्यावर रोखले. या कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादही झाला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सात शाळांना सुट्टी, शहरात कडेकोट बंदोबस्त अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरातील सात शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरभर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहेत. राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा दौरा अमित शहा यांचा हा दौरा केवळ धार्मिक किंवा विकासकामांपुरता मर्यादित नसून राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प, सहकार क्षेत्रातील कार्यक्रम, सीमा प्रश्नावरील हालचाली आणि राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडी यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले? अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या या ऐतिहासिक आणि पवित्र नगरीमध्ये अंबाबाईच्या मंदिराचे सुशोभीकरण अमितभाई शहा यांच्या हस्ते झाले आहे. खरं म्हणजे आज या शक्तिपिठाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू होत आहे. उभ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठवण्याचा आजचा दिवस आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे अमितभाई आणि कोल्हापूरचे नाते काय आहे, अमितभाई कोल्हापूरचे जवाई आहेत. त्यामुळे आपल्या भाभीजी देखील खुश होतील. आणि कोल्हापूरच्या प्रेमापोटी ते इथे येतात. मोदी यांची नीती आहे विकास आणि विरासत. म्हणूनच मोदी यांनी 12 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केले आणि त्यात अमितभाई त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे होते. देशातल्या जनतेला सुरक्षित भावना मिळत आहे आणि दहशतवाद्यांना भीतीचा गोळा येतो ते अमितभाई यांच्या मुळे. अमितभाई यांनी नक्षलवाद संपवून टाकण्याचे काम केले आहे. ते जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी गृहमंत्री म्हणून उत्तम काम केले आहे. आज सहकार क्षेत्रात क्रांती घडवण्याचे काम देखील त्यांनी केले आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस म्हणाले, करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांच्या प्राचीन मंदिराचे जीर्णोद्धार आणि विकास ज्यांच्या शुभहस्ते झाले ते भारताचे अत्यंत कर्मठ आणि कणखर असे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते झाले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांचे जे स्वप्न होते, महालक्ष्मी मंदिर जे पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, ही इच्छा पूर्ण करण्याची सुरुवात आज झाली आहे. महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूरकरांची जी इच्छा होती, तीच इच्छा दिल्लीतून एक व्यक्ती व्यक्त करत होते, ती व्यक्ती म्हणजे अमितभाई शाहा. ते म्हणायचे की तुमच्याकडे इतके शक्तिशाली मंदिर आहे, त्याचा विकास अजून पाहिजे तसा झाला नाही. आणि त्यांनी आग्रह केला की जी काही मदत लागेल मी करेल. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अमितभाई कोल्हापूरचे जावाई आहेत. अधिकमास झाल्यानंतर अमितभाई आले, मात्र कोल्हापूरकरांचे तुमच्यावर एवढे प्रेम आहे की तुमची सेवा आम्ही आजही करू. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विकास आणि विरासत हा मंत्र दिला आहे. आज आपला वारसा आपली परंपरा याचे प्रतीक असलेले मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे. या परंपरेत या मंदिराने आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आशीर्वाद दिला आहे. ज्यावेळी संपूर्ण भारतात आमच्या मंदिरांचा विनाश होत होता, त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांनी पुनर्जीवन दिले, तीच परंपरा माननीय मोदी यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आम्ही जात आहोत. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मंदिरात जिथे 50 लाख भाविक येतात, तिरूपती बालाजी यांचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेतात. भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या भाविकांची सेवा करता यावी साठी आम्ही काम करत आहोत. कोट्यवधी भाविक पंढरपूरला जातील त्यांना ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, त्यातून पांडुरंग अधिक आशीर्वाद देईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच सगळ्याच शक्तिपीठांचा विकास आपण हाती घेतल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.
