अभ्यास दौऱ्यातून प्रशासनाचा थेट धांडोळा; बाजार व्यवस्थेचीही सखोल ओळख

पंचायत समिती ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अनुभव

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : केवळ पुस्तकापुरते ज्ञान नको, तर प्रत्यक्ष अनुभवातून सुजाण नागरिक घडवायचे — या ध्येयाने मारेगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेला शैक्षणिक अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. बी.ए. भाग तृतीयच्या विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देत प्रशासन व शेतमाल विपणन व्यवस्थेचा थेट धांडोळा घेतला.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पंचायत समिती मारेगाव येथे भेट देत स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना, अधिकार व जबाबदाऱ्या यांचा सखोल अभ्यास केला. गटविकास अधिकारी व्ही.बी.व्हनखंडे (BDO) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालविकास आणि रोजगार हमी यांसारख्या विभागांच्या योजना अंमलबजावणीची प्रक्रिया उलगडण्यात आली.

निधी वितरण, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि शासन योजनांची अंमलबजावणी कशी केली जाते, याबाबत विद्यार्थ्यांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

यानंतर विद्यार्थ्यांचा मोर्चा वळला कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावकडे. सचिव श्री. खाडे यांनी बाजार समितीची रचना, शेतमाल बाजारात दाखल होण्याची प्रक्रिया, लिलाव पद्धती, हमीभाव व्यवस्था तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची सविस्तर माहिती दिली. बाजारातील व्यवहारातील पारदर्शकता आणि कायदेशीर चौकट विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दर मिळवून देणारी ही यंत्रणा कशी कार्यरत असते, याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली.
हा संपूर्ण अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. प्रवीण पोटे यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. प्रा. अस्मिता ढवस, प्रा. श्रीकांत सूर तसेच राहुल पिंपळकर यांचीही उपस्थिती लाभली.

सैद्धांतिक ज्ञानाला व्यवहार्य परिमाण देणारा हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरला. प्रशासन आणि बाजार व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून भविष्यातील जबाबदार, सुजाण नागरिक घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रभावी पाऊल ठरला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!