शरद पवारांकडून PM मोदींचे कौतुक:मोदी देशाबाहेर भारताची प्रतिमा जपत असल्याची स्तुतिसुमने; संजय राऊतांनी दर्शवली असहमती

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आमची वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी आज ते जगात भारताची प्रतिमा जपण्याचे काम करत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींचे कौतुक केले आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी आम्ही शरद पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही, असे म्हटले आहे. तर इंदिरा गांधी यांच्याशी शरद पवार सहमत आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी असू शकते पण आज देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करताय हे विसरून चालणार नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. पंतप्रधानांनी उत्तर दिलेच पाहिजे. इंदिरा गांधी यांच्याशी शरद पवार सहमत आहेत का? इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि नरसिंहराव हे परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते शरद पवार तर सरकारमध्येसुद्धा होते त्यावेळी. ते प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते असे म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी- प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 देशाचा दौरा केला. तिकडच्या पत्रकारांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायचे सोडून तुम्ही पळून का जात आहात? नार्वेमधील पत्रकाराने प्रश्न विचारला आणि मोदी पळताना दिसले हे चित्र भारताच्या लोकशाहीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मग देव घाबरतो कशाला? संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत आपले भाषण करत निघून जातात. 12 वर्षांमध्ये एकदाही पत्रकार परिषद घेत नाहीत. दुसऱ्या देशातील माध्यमांशी न बोलताच निघून जातात अन् स्वत:ला सक्षम नेतृत्व म्हणतात. आपण देशाचे नेतृत्व करतात तुमच्या पक्षाचे लोकं तुम्हाला देव मानतात मग देव घाबरतो कशाला? असा खोचकसवाल राऊत यांनी केला आहे. नार्वेमधील पत्रकारने प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यायला पाहिजे होते. पण ते न केल्याने तुम्ही देशाची प्रतिमा मलिन केली आहे. उगाच इतर देशात जाता कशाला? यापूर्वीचे पंतप्रधान बाहेर देशात जाऊन पत्रकार परिषद घेत होते. तिथल्या पत्रकारांशी संवाद साधत होते. मोदी केवळ फिरण्यासाठी देशाबाहेर जातात. पंतप्रधानपद जाण्यापूर्वी मोदींनी एकदा तरी पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे. ..तर ‘देशद्रोही’ ठरवले जाते संजय राऊत म्हणाले की, देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला देशद्रोही मानले जाईल. औषध विक्रेते आणि वाहतूक असोशिएशन यांच्यासह अनेक जण संप करू इच्छित आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उत्तर देणार का? नाही यावर जनतेलाच पर्याय शोधावा लागणार आहे. दिल्लीसाठी अख्खे विमानच बुक केले असेल संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली प्रवासासाठी नॉर्मल विमान पूर्ण बुक केले असेल हे लोकं काहीही करू शकतात, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्या विमानातील सर्व प्रवासी यांचेच असतील. हे खासगी विमानाशिवाय फिरू शकत नाही. त्या विमानाची जेवढी क्षमता आहे तेवढे लोकं यांचेच आहेत, असे म्हणत राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे. शहा-मोदी फाईल्स चित्रपट यायला हवा! संजय राऊत म्हणाले की, अनेक फाईल्स नावाने चिटपट येत आहेत पण मोदी यांची फाईल कधी निघणार असा सवाल राऊत यांनी केली आहे. अमित शहा आणि मोदी फाईल्स असा एक चित्रपट आला पाहिजे. बंगालमध्ये जी निवडणूक झाली त्यावर एकनवा चित्रपट आला पाहिजे की भाजपने कशी निवडणूक लढवली. महाराष्ट्रात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत, येणाऱ्या चित्रपटात हे येईल का? महाराष्ट्र सरकार कसे बनवले गेले? सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाच्या मदतीने कसे महाराष्ट्रात सरकार तयार झाले हे चित्रपटात येईल का? तसे झाले तर आम्ही चित्रपटाचे स्वागत करू.

Leave a Comment

error: Content is protected !!