ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल जंगलात स्थलांतरित केलेल्या ‘झीनत’ वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वनविभागाद्वारे राबवलेली आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर मोहीम यशस्वी ठरली आहे. सिमिलीपालमधील वाघांचा वंश सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. सिमिलीपाल अभयारण्यातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील आनुवंशिक दोष टाळण्यासाठी ओडिशा सरकारने ताडोबातून वाघ आणण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये ताडोबाच्या जंगलातून ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणी ओडिशात पाठवण्यात आल्या होत्या. डिसेंबर 2024 मध्ये ‘झीनत’ने सिमिलीपालच्या सीमा ओलांडून झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये सुमारे 250 किलोमीटर भटकंती केली. त्यानंतर बंगाल आणि ओडिशा वनविभागाने संयुक्त मोहीम राबवून तिला सुरक्षित पकडले. काही महिने विशेष देखरेखीखाली ठेवल्यानंतर, एप्रिल 2025 मध्ये तिला पुन्हा सिमिलीपालच्या मुख्य जंगलात सोडण्यात आले. तिथे तिचे स्थानिक नर वाघाशी मिलन झाले आणि आता तिने चार बछड्यांना जन्म दिला आहे. सध्या सॅटेलाईट कॉलरद्वारे या नव्या कुटुंबावर लक्ष ठेवले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढत असल्याने, येथील वाघ इतर जंगलांमधील वाघांची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आंतरराज्यीय स्थलांतर प्रकल्पांतर्गत ताडोबातून ओडिशात ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणींचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रांतर्गत वन्यजीव संतुलनासाठी ताडोबातून यापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव-नागझिरा अभयारण्यातही वाघिणी पाठवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या राज्यात जाऊन स्थानिक वाघाशी मिलन करून बछड्यांना जन्म देण्याचा ‘झीनत’चा हा पराक्रम भारतीय वन्यजीव इतिहासात महत्त्वाचा मानला जात आहे.
ताडोबाच्या ‘झीनत’ वाघिणीने ओडिशात 4 बछड्यांना दिला जन्म:देशातील पहिला आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर प्रयोग यशस्वी
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल जंगलात स्थलांतरित केलेल्या 'झीनत' वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वनविभागाद्वारे राबवलेली आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर मोहीम यशस्वी ठरली आहे. सिमिलीपालमधील वाघांचा...