उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा; “जल ही जीवन आहे”चा संदेश
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव, दि. 28 मार्च — वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर मारेगावात नागरिकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. स्वर्गीय मारोती पाटील रोगे व स्वर्गीय सुंदराबाई रोगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दयालभाऊ रोगे यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

मारेगाव येथील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप समोर उभारलेल्या या पाणपोईचे उद्घाटन तहसीलदार उत्तमराव निलावाड यांच्या हस्ते शनिवारी सकाळी 11:15 वाजता पार पडले. यावेळी “जल ही जीवन आहे” हा संदेश देत समाजोपयोगी कार्यातून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी दयालभाऊ रोगे, पंकज पिदुरकर, रोशन मोते, पोलिस कर्मचारी विठ्ठल बुरुजवाजे तसेच पेट्रोल पंपवरील कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.

या पाणपोईमुळे परिसरातील नागरिक, प्रवासी व वाहनचालकांना उन्हाळ्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मारेगावात अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
