नागरिकांच्या प्रश्नांना जागेवरच न्याय; प्रशासनाचा लोकाभिमुख उपक्रम
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : नागरिकांच्या विविध महसुली अडचणींना तात्काळ दिलासा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चा आज, शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी बोटोनी येथे उत्साहात शुभारंभ होत आहे.
तहसील कार्यालय मारेगाव, महसूल मंडळ जळका (बोटोनी) यांच्या पुढाकाराने तसेच महावितरण, आरोग्य, वन, कृषी, पोलीस आणि एसटी महामंडळ आदी विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बोटोनी येथे सकाळी १० वाजता शिबिरास प्रारंभ होणार असून नागरिकांच्या महसुली समस्यांचे जागेवरच निवारण करण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे. या शिबिरामध्ये ७/१२ उताऱ्यांतील दुरुस्त्या, फेरफार प्रकरणे, नवीन नोंदी तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण एकाच छताखाली करण्यात येणार आहे.

विशेषतः शेतजमिनीच्या हक्कांशी संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण होणार असल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ‘डिजिटल ७/१२’ संदर्भात जनजागृती केली जाणार असून ई-मोजणी, वारस नोंदणी यांसारख्या सेवांसाठी जागेवरच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी ‘अग्रिस्टॅक’ व ‘पीएम किसान’ योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते योजना’ अंतर्गत प्रस्तावित रस्त्यांवर सुनावणीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे शिबिर नागरिक व शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप सोल्युशन’ ठरणार आहे.
या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळून नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
