Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मारेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा दुष्काळ!

भाजपचा इशारा – ‘आता आरपारची लढाई’

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा संतापजनक आरोप भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आला आहे.

तालुकाध्यक्ष अविनाश देविदास लांबट यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार बोट ठेवले आहे. “राज्य महामार्गावर वसलेल्या मारेगाव तालुक्यात अपघातांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी तातडीच्या उपचारासाठी डॉक्टरच नसणे, ही केवळ निष्काळजीपणा नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी व दुर्गम असल्याने येथील गरीब जनतेला खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही. परिणामी, ग्रामीण रुग्णालय हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव आधारस्थान आहे. मात्र, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे ही आरोग्यसेवा अक्षरशः ठप्प झाली असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, काही दिवसांत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत “आता आरपारची लढाई लढू” असा इशाराच देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांमध्ये रोषाची लाट उसळली आहे. आता प्रशासन जागे होणार का, की आंदोलनाचा भडका उडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या निवेदनावेळी प्रशांत नांदे, सुरेश लांडे, प्रवीण बोथले, अनूप महाकुलकर, वैभव पवार, प्रसाद ढवस, गणेश खडसे, सुभाष खडसे, सुनील देऊळकर, अमोल कुमरे, पवन ढवस आदी उपस्थित होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!