सुरक्षेअभावी नागरिकांमध्ये संताप
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 65 वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत महिला सौ. बेबीबाई तुळशिराम राजगडकर (वय 65, रा. नरसाळा) या रविवारी दि. 19 एप्रिल 2026 रोज सकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास घरातील कपडे धुण्यासाठी गावातील सरकारी गिट्टी खदान परिसरातील पाण्याच्या खड्यात गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.
दरम्यान, गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शोध घेत असताना त्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या. तात्काळ त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. असुन कलम 194 बीएनएसएस अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पती,दोन मुलं, सुना नातवंड आप्तपरिवार आहे.
दरम्यान, गावातील सरकारी खदान परिसरात सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
