प्रतिनिधी | अहिल्यानगर “विज्ञानाने आज प्रगती करून कृत्रिम हृदय तयार केले असले, तरी ते चालवणारे रक्त अद्याप विज्ञान प्रयोगशाळेत बनवू शकलेले नाही. रक्ताची गरज केवळ आणि केवळ मानवी रक्तदानातूनच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कर्तव्याच्या भावनेने रक्तदान करणाऱ्यांइतकीच, प्रामाणिकपणे रक्त संकलन आणि पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज समाजाला गरज आहे. जनकल्याण रक्तपेढी हे सेवाकार्य सक्षमपणे करत आहे,” असे प्रतिपादन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी केले. येथील जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने नगर शहर व जिल्ह्यात वर्षभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांसाठी स्नेहमेळावा व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध सामाजिक संस्था, युवक मंडळ आणि ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना पारगावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी मेळाव्याला सदिच्छा भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले. व्यासपीठावर जनकल्याण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, विचार भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे, रक्तपेढीचे अध्यक्ष अभय मेस्त्री, कार्यवाह सतीश इंदानी उपस्थित होते. भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली. नानासाहेब जाधव म्हणाले, “समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करून मानसिकता निर्माण करण्याचे मोठे कार्य संयोजक करत आहेत. निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या रा.स्व. संघाच्या १४ रक्तपेढ्या राज्यात कार्यरत असून, त्या थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त पुरवत आहेत.” प्रास्ताविकात सतीश इंदानी यांनी सांगितले की, रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या या केंद्राने जिल्ह्यातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना वार्षिक १५ ते १८ लाख रुपयांचे रक्त मोफत दिले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी ‘नॅट टेस्टेड ब्लड’ ही अत्याधुनिक प्रणाली केंद्राने स्वीकारली आहे. या वेळी सहकार्यवाह आदित्य चांदेकर यांनी भविष्यात अधिक शिबिरे घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला डॉ. दिलीप धनेश्वर, हिराकांत रामदासी, महेंद्र चंदे, सुधीर लांडगे, रुपेश भंडारी, डॉ. ओजस जोशी, प्रा. भानुदास जगताप, सागर उंडे, स्मिता बडवे उपस्थित होते. परिचय लक्ष्मिकांत पारगावकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सोनाली खांडरे यांनी केले, तर आभार डॉ. विलास मढीकर यांनी मानले. रक्तपेढ्यांद्वारे थॅलेसेमिया निर्मूलनाचा केला संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आगामी शताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या ‘पंच परिवर्तन’ उपक्रमांची माहिती प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी या वेळी दिली. समाजात समरसता, पर्यावरण रक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्य या पाच आयामांवर संघ आगामी काळात व्यापक काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील १४ संचलित रक्तपेढ्यांद्वारे थॅलेसेमिया निर्मूलनाचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.