दिग्रस नगर परिषद हद्दीतील वाल्मिकनगर बायपास आर्णी पुलापासून जुन्या आर्णी पुलापर्यंत सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून “हे बांधकाम नागरिकांच्या सुरक्षेसाठी की भ्रष्टाचारासाठी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा निधी हडप करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांच्या मते, संरक्षण भिंतीचा पाया अत्यंत कमी खोलीचा खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गाळ आणि कचऱ्यावरच काँक्रीट टाकण्यात येत असल्याने भविष्यात जोरदार पावसात ही भिंत वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. थातूरमातूर खोदकाम, बारीक गज आणि घाईगडबडीत सुरू असलेले काँक्रिटीकरण पाहता हे काम किती टिकाऊ राहणार? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे काम सुरू झाले असते तर पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंत पूर्ण होऊ शकली असती. मात्र आता अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एवढ्या घाईमागचे नेमके कारण काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. नदीकाठचा परिसर खोदून उघडा टाकल्यामुळे पूरस्थितीत पाणी थेट वस्तीत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. एखाद्या मोठ्या पुरात संपूर्ण परिसर पाण्याखाली जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचार करायचाच होता तर गरीब नदीकाठच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. नागरिकांनी या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कारवाई करावी आणि पावसाळ्यापूर्वी सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.