पैनगंगा नदी पात्रातील हर्रासी न झालेल्या बोरी-चातारी रेतीघाटावर रेती हंगाम २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या विद्रुप झालेल्या नदीपात्राची पाहणी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी लावून धरली होती. अखेर, वाळूघाटांची अधिकृत मुदत संपल्यानंतर जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक धनाजी जाधव हे पथकासह दि. १२ जून रोजी पहाटे संबंधित तक्रारकर्ते व तलाठ्याला सोबत घाटावर दाखल झाले. मात्र, संपूर्ण हंगामभर अवैध वाळू उपसा झाल्यानंतर आता झालेल्या पाहणीमुळे खनिकर्म विभागाचे हे पाऊल म्हणजे “वरातीमागून घोडे’ नाचवण्याचाच प्रकार असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विदर्भ – मराठवाड्याच्या सिमावर्ती भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात बोरी चातारी हद्दीत स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहमतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून लाखो रुपयांची वाळू तस्करी होत असल्याच्या पर्यावरण प्रेमी नागरीकांच्या तक्रारी मागील ३ ते ४ महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडे सुरुच आहेत. परंतू स्थानिक महसूल प्रशासनाने तक्रारींना जुमानले नाही. दि. ३० मार्च रोजी एलसीबीकडून चातारी वाळूघाटात उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्याचा प्रयत्न झाला, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे हा वाळूघाट चांगलाच गाजला होता. तेव्हापासून महसूल प्रशासनाच्या अखत्यारित पोलिसांचा हस्तक्षेप झाला नाही. त्यानंतर स्थानिक महसूल अधिकारी व वाळूमाफिया यांची जमल्याने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू झाली.वाळू उत्खननाच्या तक्रारी वाढत असल्यातरी या वाळू घाटावर रेती तस्करांचा मुक्त संचार होता. कार्यवाही करण्यास कोणताही अधिकारी धजावत नव्हता. अशा तऱ्हेने दि. १० जून रोजी वाळू घाटांची मुदत संपली आता नदीपात्रात पाणी यावे, त्याबरोबर खड्डे झाकून जावे, अशी मागणी स्थानिकांची होती. दरम्यान ११ जून रोजी कॅनलचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले, परंतु बचाव झाला नाही, बोरी वाळूघाट भागात पाणी मात्र पोहचलेच नाही, त्यामुळे वाळू चोरीला गेल्याचे खनिकर्म पथकाच्या लक्षात आले. जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय पथकामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक धनाजी जाधव, महसूल सहाय्यक सुरेश ठोंबरे, वाहन चालक निलेश भाटबडवे यांच्यासह स्थानिक तलाठी राहुल चव्हाण, बोरीचे पोलिस पाटील प्रदीप माने यांचा समावेश होता. आपल्याकडे भरमसाठ पुरावे जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे पथक पहाटे बोरी चातारी वाळूघाटात दाखल झाले. नदीपात्रात तीन किलोमीटर पाहणी केली, परंतू त्यांनी विदर्भ हद्दीतील पाणी व खडक असलेल्या जागेवर उभे राहुन फोटो काढले, जास्त प्रमाणात उत्खनन झालेल्या ठिकाणचे गुगल टॅग फोटो काढण्यास नकार दिला शेवटी त्यांच्या एकंदरीत देहबोलीतून गोंधळ उडाल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे अहवाल सकारात्मक राहण्यासाठी शंकेची पाल चुकचुकली आहे. आपल्याकडे भरमसाठ पुरावे असून याबाबत शर्थीने पाठपुरावा करणार आहे. – विद्यानंद देवसरकर , सामाजिक कार्यकर्ता, दिघी ता. हिमायतनगर
