देशाच्या भविष्यातील विकासाचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना २०२६ मोहिमेत शिक्षक बांधव अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे सहभाग घेत आहेत. कडक उन्हातही घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करीत आहेत. राज्यभर तापमानाचा पारा वाढलेला असतानाही शिक्षक प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत. जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि लोकसंख्यात्मक स्थितीचे वास्तव चित्र मांडणारी महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया मानली जाते. शासनाच्या विविध विकास योजना, शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, रुग्णालये, रोजगार व सामाजिक कल्याण योजनांचे नियोजन याच माहितीच्या आधारे ठरत असल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील दुर्गम वाड्या-वस्त्यांपासून शहरातील गल्लीबोळांपर्यंत शिक्षक नागरिकांच्या घरी जाऊन माहिती नोंदवत आहेत. अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र तडाखा, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि विश्रांतीची सुविधा नसतानाही शिक्षक राष्ट्रहिताला प्राधान्य देत आपली सेवा बजावत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी नागरिकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासनाने नागरिकांना अचूक माहिती देऊन जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक घरातून मिळणारी माहिती भविष्यातील विकास आराखड्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने जनगणना ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून राष्ट्रनिर्मितीचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया आहे. शिक्षक व कर्मचारी कठीण परिस्थितीत प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. – विजय साळवे, तहसीलदार, घाटंजी