मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रांमध्ये एकूण ६ हजार ८३६ शेत पाणंद रस्ते निश्चित करण्यात आले आहे. या रस्त्यांची एकुण लांबी सुमारे ११ हजार ५४० किलोमीटर असून त्यासाठी अंदाजे १५०२ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना दिली. पाच वर्षात टप्प्याटप्प्याने व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासन, जिल्हा नियोजन, खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध केला जाणार असून त्यामाध्यमातून शेत पाणंद रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रात १७५३ किमी लांबीचे १ हजार ११३ रस्ते असून, त्यासाठी अंदाजित रक्कम २६२.९५ कोटी रुपये, राळेगाव विधानसभा क्षेत्रात राळेगाव, कळंब व बाभुळगाव तालुक्यात १८५० किमी लांबीचे १०९९ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम २४८.७० कोटी रुपये, आर्णी विधानसभा क्षेत्रातील आर्णी, केळापूर व घाटंजी तालुक्यातील १५८० किमी लांबीचे ६७२ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम २२१.२० कोटी रुपये, वणी विधानसभा क्षेत्रातील वणी व मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील २२९७ किमी लांबीचे १६६२ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम ३४२.६६ कोटी रुपये. दिग्रसमध्ये विधानसभा क्षेत्रातील दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील २३४४ किमी लांबीचे ११६२ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम २८९.३७ कोटी रुपये तसेच पुसद, उमरखेड, महागांव साठी निधी निश्तिच केला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी विविध यंत्रसामुग्री व पाईप पुरवठ्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीमार्फत विधानसभा मतदारसंघनिहाय त्याचे दर निश्चित करण्यात आले असून, ५३ निविदाधारकांपैकी ५२ निविदाधारकांनी कमी दराने काम करण्यास सहमती दर्शविली आहे.