पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे.त्यामुळे विधान परिषदेसाठी आमच्याकडे इच्छूकांची संख्या मोठी आहे. या जागेवर आमचाच हक्क आहे. भाजप आणि शिवसेना या बाबत निश्चित योग्य निर्णय घेतील. कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरलेले नाही पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. आजची बैठक ही केवळ पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची आहे त्यामुळे राज्यात किती जागा लढवायच्या हे आज ठरणार नाही, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. दत्तात्रय भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून पूर्वी कर्ज माफी करणार असा निर्णय जाहीर केला होता. राज्यातील सर्व शेतकरी बांधवाची कर्ज माफी 30 जून पूर्वी केली जाईल. दोन लाखावरील कर्ज शेतकऱ्यांनी भरल्यास 2 लाखांची कर्जमाफी दिली जाईल असे भरणे यांनी म्हटले आहे. महायुतीमध्येच विधान परिषद लढवणार दत्तात्रय भरणे म्हणाले की, सुनेत्रा पवारांनी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबारी सांभाळली आहे. त्याअनुषंगाने सुनेत्रा पवार आजी माजी लोकप्रतिनिधींशी चर्चा करत आहे. पुणे विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार आहे, कारण आमच्या पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. या संदर्भात आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा द्यायच्या यावर महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत. महायुतीमधील मोठा भाऊ असलेला भाजप पक्ष दोन्ही मित्र पक्षाचा सन्मान राखेल, असे भरणे यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षात काही वाद नाही दत्तात्रय भरणे म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये कुठेही संभ्रम नाही. आम्ही सर्व एकत्रित सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. पक्षात काही वाद आहेत या सर्व अफवा आहेत. आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठ आहे. शेतकऱ्यांना घाबरण्याची कारण नाही. जे पंपचालक चुकीची माहिती देत आहेत अटी घालत आहेत त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्यात येईल.
