मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आंदोलन केले. त्यावर जरांगे यांनी सध्या तरी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. पण सरकारने मराठा समाजाला अद्याप सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही? असा सवाल करत लाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या आवाहनावर जरांगे कोणती भूमिका घेतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 30 तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचे रान पेटले आहे. जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी नुकतीच प्रसाद लाड यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार लाड यांनी आज त्यांची आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत प्रदिर्घ काळ चर्चा झाली. त्यात लाड यांना जरांगे यांना सध्याचा उन्हाचा कडाका व शेतीच्या मशागतीची कामे पाहता त्यांचे आगामी उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन केले. प्रसाद लाड म्हणाले, सध्या कडाक्याचे उन पडले आहे. तसेच खरीप हंगामाचीही कामेही सुरू आहेत. त्यामुळे माझे मनोज जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन आहे. सरकार आपल्या जागी आहे. मी मराठा समाजातर्फे त्यांना हे आवाहन करत आहे. मी गीतेतला सार घेऊन येथे आलो आहे. मुख्यमंत्री जातीचे नसतानाही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. हा जरांगे यांचाच विजय आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले. जरांगे व माझ्यात अनेकदा वाद प्रसाद लाड म्हणाले, माझे व मनोज जरांगे यांच्यात अनेकदा वाद झाले हे मला मान्य आहे. मराठा समाजाचा लढा 1981 पासून सुरू झाला. जरांगे यांनी लढा दिला. त्यामुळे माझ्या समाजाला आरक्षण मिळाले. त्याविषयी मी जरांगे यांचे आभार मानतो. मी त्यांना विनंती केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घ्या. मागील 70 वर्षांत कोणत्याही मराठा नेत्याने केले नाही, असे काम फडणवीस यांनी केले आहे. जरांगेंनी 30 मेपासून आंदोलन करू नये. सध्या उन्हाचे दिवस आहेत. मी आमदार व नेता म्हणून येथे आलो नाही. सामान्य समाजाचा माणूस म्हणून मी येथे आलो आहे. मनोज जरांगेंनी मला 23 तारीख दिली. पण मी 22 तारखेलाच येथे आलो. तुम्ही निमंत्रण दिले. तुमचा मान म्हणून आलो. तुमच्या मनात असलेल्या द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही निर्णयांची ग्वाही दिली जाते. ते विषय सभागृहात नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून कसा मार्ग निघेल ते पाहू. मी तुमचा लहान भाऊ म्हणून येथे आलो आहे. मी त्यांच्या 7-8 मागण्या समजून घेणार आहे. त्यांचे विषय सरकार दरबारी मांडणार आहे. मी त्यांना वेळोवेळी भेटत राहील. मी सरपंचाच्या शेतातील ड्रॅगन फ्रुटही खायला येईल. एका मराठा समाजाचा व्यावसायिक आहे. त्याचा मला अभिमान आहे. मी राजकारणावर धंदा करत नाही, असे लाड म्हणाले. लक्ष्मण हाकेंचा गैरसमज दूर करणार प्रसाद लाड यांनी यावेळी लक्ष्मण हाके यांचाही गैरसमज दूर करण्याची ग्वाही दिली. लक्ष्मण हाके यांचा या प्रकरणी पोटशूळ उठण्याचे कारण नाही. मी त्यांचा गैरसमज दूर करेन. मनोज दादांचे अनेकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. ते आजही थेट फोनवर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात. जरांगेंची भेट घेण्यापूर्वी मला धमकीचे फोन आले. असे फोन येतच असतात. काल काही लोकांनी मी राहत असलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला आईवरून शिवीगाळ केली. माझ्या डोळ्यांत पाणी आले. शिव्या देणे सोपे असते. पण हृदयाला ठेच लागते. मला सांगा मी केठू येऊ, मला मारा, असे लाड म्हणाले. उपोषणाला बसलो काय पाप केले? – जरांगे त्यावर जरांगे म्हणाले, प्रसाद लाड यांच्यात आम्हाला समाजाविषयी तळमळ दिसली, म्हणून आम्ही त्यांना चर्चेला बोलावले. सरकारने मागण्या मान्य केल्या तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवले असे मला वाटत आहे. त्यामुळे मी त्यांना मुख्यमंत्री शिष्टमंडळ असे म्हणालो. आम्ही उपोषणाला बसलो काय पाप केले? सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र का दिले नाही? सारखी अंतर्गत मराठा विद्यार्थ्यांची संख्या का कमी केली? 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली? मला फक्त माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. आम्हाला बाकी काहीही माहिती नाही. 2004 च्या जीआरनुसार मराठा व कुणबी एकच आहेत. 4 वर्षांत ओबीसींची संख्या 30 टक्के कशी वाढली? जरांगे म्हणाले, आम्ही ओबीसींचे आरक्षण मागत नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. आमची लेकरे स्वतःचे शेत असूनही दुसऱ्यांच्या शेतात काम करतात. ऊस कामगार म्हणून कामाला जातात. सरकारकडून ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिले जाते. ओबीसीचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटत आहे तेच मला कळत नाही. ओबीसी आरक्षणाला नेमका कोणता निकष लावला? आम्हाला तीनवेळा मागास सिद्ध केले तरी आरक्षण मिळत नाही. 1994 ला ओबीसींना कोणत्या आधारावर आरक्षण दिले? आमचे गॅझेट आहे तर आम्हालाही आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही? 4 वर्षांत ओबीसींची संख्या 30 टक्के कशी वाढली? हा ही मोठा प्रश्न आहे, असे जरांगे म्हणाले. जरांगे यांच्या या कडवट भूमिकेमुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणात वाढीव जाती का घातल्या? जरांगे पुढे म्हणाले, सरकारने मोठ्या मनाने जीआर काढला. ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या. आंदोलन सुरू असताना 26 जाती घातल्या. आंदोलन आमचे, जाती घालता त्यांच्या. त्या सुद्धा ज्या बसत नाही. गरीब कोण आहेत? आरक्षणाचा मागास ठरवण्याच निकष काय? गरीब म्हणून निकष लावला का? तसे असेल तर आम्ही तुम्हाला गरीब मराठे दाखवतो. मराठा समाजाला का आरक्षण द्याचे नाही. मराठा समाजाकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचे नाही का? असा काही निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळ यांच्याकडेही कारखाने दाखवतो. त्यांची जात बाहेर काढा. मराठा समाजाकडे पेट्रोल पंप आहेत म्हणून त्यांना आरक्षण द्याचे नाही हा निकष असेल, तर मी तुम्हाला परळीला पेट्रोल पंप दाखवतो. त्यांची जातही बाहेर काढा. काय आहे तुमचा आरक्षणाचा निकष? तुम्हाला काय वाटते हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही व्यवसायावर आधारित आरक्षण दिले. केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा असा नियम व निकष असेल तर त्यांना मागास सिद्ध केले आहे. विदर्भातील मराठा समाज शेती करतो. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळाले. हा व्यवसायावर आधारित निर्णय झाला, मग आमच्याकडे समुद्र आहे का? असा सवालही जरांगे यांनी प्रसाद लाड यांना केला. मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा -जरांगे मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदींचे काय झाले? नोंदी सापडूनही तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? मुंबईतील आंदोलनावेळी दिलेली आश्वासने सरकारने 8 महिने लोटले तरी पूर्ण केले नाही. या प्रकरणी सरकारने आमची दिशाभूल केली. सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली. …तर मी उद्या सकाळी फाशी घेतो – जरांगे आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना कधीही वाईट बोललो नाही, मग आमच्यावर लाठीचार्ज का करण्यात आला? मला पैशाचे किंवा पदाचे आमिष दाखवून कोणीही फोडू शकत नाही. मी सरकारकडून एक रुपया घेतला किंवा काम घेतले, असे कोणीही सिद्ध करून दाखवावे. जर असे सिध्द झाले तर मी मी उद्या सकाळी फाशी घेतो, असे जरांगे म्हणाले. लाड मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार प्रसाद लाड यांनी यावेळी मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याची माहिती फोनवरून जरांगेंना कळवण्याची ग्वाही दिली. 29 तारखेला आंतरवाली सराटीत येऊन जरांगेंची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यावर मनोज जरांगे यांनी लाड यांच्यावर विश्वास दाखवत आपल्या बैठका थांबवण्याची घोषणा केली. पण सोबतच 30 तारखेपासून होणारे उपोषण होणार असल्याचेही स्पष्ट केले. आत्ता पाहू मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
