डिझेलसाठी कलेक्टरची परवानगी आणा, पंपचालकांकडून अडवणूक:शेतकऱ्यांनी दिली गोरसेनाला हाक, पदाधिकारी धावले मदतीला‎

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुसद तालुक्यात शेतकऱ्यांसमोर डिझेलचे मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रॅक्टरसाठी व कॅनमध्ये डिझेल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंपचालक जिल्हाधिकारी परवानगी घेऊन पत्र आणा, तरच डिझेल देऊ असे सांगून परत पाठवत आहेत. त्यामुळे नांगरणी, वखरणीची कामे ठप्प झाली असून, संतप्त शेतकऱ्यांनी गोरसेना पश्चिम यवतमाळचे जिल्हाध्यक्ष जय राठोड यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सुद्धा सोबत दि.२२ मे रोजी दिलेल्या निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे. या प्रकरणी जय राठोड, मनीष जाधव यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन दिवसात लेखी आदेश काढण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल नाकारणे म्हणजे शेती बुडवण्याचा डाव आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शेतीसाठी डिझेल नाकारता येत नाही. तरीही पंपचालक मनमानी करत आहेत. हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. डिझेल न मिळाल्याने जर पेरणी लांबली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल. पंप वाले “कलेक्टरची परवानगी’ या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत, असा कोणताही जीआर नाही. हा निव्वळ शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण? वेळेवर नांगरणी-वखरणी झाली नाही तर पेरणी लांबणीवर पडेल. उत्पादन घटेल आणि शेतकरी कर्जाच्या खाईत जाईल. डिझेल न मिळाल्याने जर एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला प्रशासन व हे पंपचालक जबाबदार राहतील, असा संतप्त सवाल दोन्ही संघटनेने उपस्थित केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!