सन २०१४ मध्ये देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत परिवर्तनाचा कौल दिला आणि त्यातून नवभारताच्या निर्मितीचा प्रवास सुरू झाला. गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाली असून महामार्ग, एक्सप्रेसवे, रेल्वे आधुनिकीकरण, विमानतळ विस्तार यासह डिजिटल क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले आहेत, असे प्रतिपादन भाजपच्या पुसद जिल्हाध्यक्षा डॉ. आरती फुपाटे यांनी केले. दिग्रस येथील गुरूकुल इंग्लिश स्कूल येथे बुधवारी आयोजित ‘मोदी सरकारची १२ वर्षे पूर्ण’ या विषयावरील पुसद जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. डॉ. फुपाटे म्हणाल्या की, ‘डिजिटल इंडिया’ अभियानामुळे आज ग्रामीण भागातील नागरिकही डिजिटल व्यवहारांशी जोडले गेले आहेत. शासनाच्या विविध सेवा ऑनलाइन झाल्याने पारदर्शकता वाढली असून थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे लाभार्थ्यांपर्यंत निधी थेट पोहोचत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा महामंत्री प्रा. दत्तात्रय राहणे यांनी प्रास्ताविकातून मोदी सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे आणि ॲड. आदित्य माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान मोठ्या स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण निर्णय आणि विकासकामांवर आधारित ‘१२ मास्टरस्ट्रोक’ या विशेष व्हिडिओचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाला उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाला भाजप व्ही. जे. एन. टी. जिल्हाध्यक्ष मनोज राठोड, एसआयआर दिग्रस विधानसभा प्रमुख अरुण राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. विवेक भास्करवार, माजी न्यायाधीश संतोष जयस्वाल, महिला आघाडी शहराध्यक्षा जागृती मेहता, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष सतीश बनगीनवार, सुभाष काटेकर, राजेंद्र ठाकरे, अनिल भरारे, सुरेंद्र मिश्रा, प्रमोद बनगीनवार, शहर उपाध्यक्ष संतोष मांजरखेडे, अल्पसंख्याक आघाडीचे वाजिद शेख, शहर सरचिटणीस अमित चिद्दरवार, संजय घरत, पवन पेठे, विष्णू जाधव, सदानंद जाधव, मंदा श्रीवास यांच्यासह दिग्रस शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी केले, तर कल्पना पवार यांनी आभार मानले. या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. आगामी काळात ‘विकसित भारत’ संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.