बातमी ऐका (Marathi Voice Reader)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील कांदा आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न असोत किंवा जलजीवन मिशनचे प्रलंबित प्रकल्प; राज्याचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही केंद्राकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? जनतेच्या हितासाठी केंद्राशी संवाद साधण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नाही.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही दोन दिवसांपासून दिल्लीत आहोत, त्याबाबत एवढा प्रश्न का पडला आहे? राज्यातील जनतेसाठी आणि महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्राकडे भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्यच आहे. अगोदरच्या सरकारला केंद्राशी बोलणे किंवा मदत मागणे कमीपणाचे वाटत असेल, पण आमची तशी भूमिका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी नेहमीच मदतीचा हात दिला असून राज्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी केंद्राकडून मिळाला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आणि विकासकामांवर लक्ष या दिल्ली दौऱ्यात प्रामुख्याने कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, ग्रामीण भागातील घराघरांत पाणी पोहोचवणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. या सर्व बैठका अत्यंत सकारात्मक झाल्या असून केंद्राकडून या प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्राकडून मिळणारे हजारो कोटी रुपये राज्यासाठी आणायचे असतील, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…