पळसोदच्या बंधाऱ्यात टंचाईतही पाणी; शेतकऱ्यांना आधार:भीषण उन्हाळ्यातही भूजलपातळी कायम; परिसरातील विहिरींना मिळाली नवसंजीवनी

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४६ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडल्यामुळे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. अनेक भागांमध्ये विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा अत्यंत भीषण परिस्थितीत अकोट तालुक्यातील पळसोद येथील ‘कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा’ (के. टी. वेअर) परिसरातील ग्रामस्थांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. जलसंधारण विभागाने उभारलेला हा बंधारा आज कडक उन्हाळ्यातही जलपातळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बंधाऱ्यात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील विहिरींना पाणी आले असून यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि जनावरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागत आहे. काही वर्षांपूर्वी ज्या भागात पाण्यासाठी तीव्र भटकंती करावी लागत होती, तिथे आज या बंधाऱ्यामुळे हिरवाई पाहायला मिळत आहे. जलसंधारणाच्या योग्य नियोजनामुळे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न कसा सुटू शकतो, याचे पळसोद येथील के. टी. बंधारा हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाच्या या कामाचे कौतुक केले आहे. हा बंधारा पळसोद परिसरासाठी आणि विदर्भाच्या मातीसाठी वरदान ठरल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली असून अशाच प्रकारे इतर भागांतही जलसंधारणाची कामे व्हावीत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडून कौतुक; ‘मातीसाठी वरदान’

Leave a Comment

error: Content is protected !!