बातमी ऐका (Marathi Voice Reader)
प्रतिनिधी |अकोला रेल्वे स्थानकाजवळील तार फैल परिसरात सोमवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दुपारी काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण यांनी बेघर झालेल्या रहिवाशांना सोबत घेत पत्रकार परिषद घेतली. मान्सूनच्या उंबरठ्यावर कुटुंबे उघड्यावर असून, या कुटुबांच्या पुनर्वसनाविना कारवाई करण्यात आली. त्यामुळे तातडीने निवाऱ्याची व्यवस्था न केल्यास बेघर झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महापालिकेच्या शाळा राहण्यासाठी ताब्यात घ्याव्या लागतील, असे आ. पठाण म्हणाले. याबाबत शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेतही मुद्दा उपस्थित करु, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात पुर्नवसानाचा मुद्दा पेटण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तारफैल परिसरात गत तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे १६५ कुटुंबांवर सोमवारी पहाटे रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केल्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप नोंदवला. “पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना करण्यात आलेली ही कारवाई केवळ अन्यायकारकच नव्हे तर अमानवी आहे, असा आरोप केला.