बार्शी तालुक्यात मशागती पूर्ण; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा:गतवर्षीच्या तुलनेत यंदा चित्र बदलल्याने खत दुकानदार आणि शेतकरी चिंतेत‎

गतवर्षी या महिन्यात जोरदार बरसात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का देणारा वरुणराजा यावर्षी मात्र दडी मारून बसला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने या महिन्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू झाल्या होत्या, परंतु जून महिन्यातील पहिला आठवडा उजाडत आला तरी तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह खत दुकानदार हवालदिल झाले असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बार्शी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण १ लाख ५ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे असेल. सुमारे ९१ हजार २२८ हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. त्यानंतर उडीद ९ हजार ४५ हेक्टर, तूर ४ हजार ५८४ हेक्टर, मूग ४५६ हेक्टर तर मका २०६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे नियोजन आखण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झाले असून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून काही ठिकाणी ही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. त्यामुळे अंदमान व केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचे आगमन या भागात नेमके कधी होणार, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा शेतकऱ्यांनी महिनाभरापासून पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरवात केली होती. ज्यांच्याकडे बैलबारदाना आहे, त्यांनी बैलांच्या साह्याने, तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या नांगरणीची कामे पूर्ण केली आहेत. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांनी जमीन पेरणीसाठी तयार केली आहे. खरीप हंगामातील उडीद, भुईमूग, सोयाबीन, तूर, सूर्यफूल तसेच इतर पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत करून आवश्यक तयारी केली आहे. सर्वत्र शेतांमध्ये मशागतीची लगबग सुरू असून शेतकरी आकाशाकडे आशेने पाहात आहेत. अनेक खरीप पिकांना समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. काही शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली होती. परंतु कवडीमोल भाऊ मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. ^शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. ७५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावर पेरणी करावी. तसेच अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातून खते, बियाणे, कीटकनाशक पक्की बिले घेऊन खरेदी करावे. जेणेकरून भविष्यात आपली फसवणूक झाल्यास कायदेशीर दाद मागता येईल. संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत; कांद्याला मिळाला कवडीमोल भाव बियाण्याचे पक्की बिले घ्यावेत

Leave a Comment

error: Content is protected !!