शहरात फार पूर्वीपासून असलेल्या मात्र मागील काह वर्षात अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या संकट मोचन परिसरातील संकट मोचन तलावाचे सौदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी त्या परिसराचे नगरसेवक लोकेश इंगोले यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर आता या कामासाठी जिल्हा विकास समितीकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पुरातन असलेल्या या तलावाचे आता जतन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या संकट मोचन हनुमान मंदीराच्या शेजारी हा तलाव आहे. त्यामुळे संकट मोचन तलाव हीच त्या तलावाची ओळख आहे. पूर्वी सतत पाण्याने भरुन राहणारा हा तलाव आता एखाद्या मोठ्या डबक्याप्रमाणे झाला आहे. तलावामध्ये सतत गाळ साचुन तो तलाव पूर्ण भरला आहे. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. परिसरातील नाल्यांमधुन वाहुन येणारे सर्व घाण पाणी थेट तलावात सोडण्यात येते. परिसरातुन निघालेला कचरा याच तलावात टाकण्यात येतो. त्यामुळे एकेकाळी सौंदर्यस्थळ असलेला हा तलाव आता केवळ जलपर्णी, गवत असलेला आणि दुर्गधी येणाला ठरत आहे. या तलावाच्या सौदर्यीकरणासाठी नगर पालिकेच्या सभेमध्ये ठराव घेण्यात आला. एक प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा नियोजन समितीमधुन निधी उपलब्ध करण्यासाठी पाठवण्यात येणार होता. या तलावाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विकास मिना यांनी तलावाला प्रत्यक्ष भेट देत त्याची पाहणी केली. यावेळी परिसरातील नगरसेवक, अधिकारी उपस्थितीत होते. तलावाच्या सौदर्यीकरणासाठी प्रस्ताव तायर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे आता या प्रकरणात लवकरच कारवाई होवुन तलाव सौदर्यीकरणाचा मुद्दा मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. यवतमाळ नगर पालिकेची हद्दवाढ झाली. त्यानंतर शहरातील सात मोठ्या ग्रामपंचायती नगर पालिकेत समाविष्ट झाल्या. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्ता जसे अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे त्यावेळी उमरसरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारा हा संकटमोचन तलाव आत्ताही जिल्हा परिषदेच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आता याच्या सौदर्यीकरणाचा प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेला तयार करण्यास सांगण्यात आले आहे.