एक महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशिष रमेश धानोरकर (वय 24) व त्यांची पत्नी करिष्मा आशिष धानोरकर (वय 19), रा. सगणापूर यांनी हिवारी मार्गालगत नवरगाव शिवारातील एका शेतातील विहिरीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आले.विशेष म्हणजे, या दाम्पत्याचा विवाह अवघ्या एक महिन्यापूर्वीच झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्याच्या अकाली निधनाने गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणाबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.मृत आशिष धानोरकर यांच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
या घटनेमुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सगणापूर गाव शोकसागरात बुडाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहेत.