महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी यशस्वी कारकीर्द गाजवलेली आहे. एकही सुट्टी न घेता काम करणारे प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर 2024 नंतर या देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत केली. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणली. 2014 पूर्वीची परिस्थिती जर आपण पाहिली तर विविध घोटाळे आपण पाहिले. परंतु मोदींच्या कार्यकाळात त्यांना एकही डाग लावण्याचे काम कोणी करू शकले नाही. राहुल गांधींनी एक वर्ष तरी देशात राहून दाखवावे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाची परिस्थिती बिकट असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली होती. यावर विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी नेहमीच देशाच्या विरोधात आरोप लावत असतात. देशात असतात तेव्हा देखील आरोप करत असतात, देशाच्या बाहेर जातात तेव्हा देखील आरोप करतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये लढलेल्या सैनिकांच्या विरोधातही ते बोलतात. आता ते म्हणाले की पंतप्रधान मोदी एक वर्षानंतर पंतप्रधान नाही राहणार, मी तर म्हणतो, ते एक वर्षच नाही ते येणारे अनेक वर्षांपर्यंत या देशाचे नेतृत्व करतील. माझे एकच म्हणणे आहे राहुल गांधींना की तुम्ही एक वर्ष सातत्याने देशात तरी राहून दाखवा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंवर टोला इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केली की इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी चेहरा घोषित करा. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, एनडीएकडे चेहरा आहे नरेंद्र मोदी. पण त्यांच्याकडे कोणता चेहरा आहे? त्यांच्यात एवढे मतभेद आहेत. इंडिया आघाडीमध्ये जे जातात ते पराभूत होतात. त्यामुळे ते सगळे इंडिया आघाडीमधून अनेक पक्ष बाहेर पडत आहेत. अजून एक कोणीतरी ऑनलाइन आले, फेसबुक लाईव्ह करायला आले, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. बच्चू कडूंच्या विधानवार काय म्हणाले शिंदे? बच्चू कडू यांनी म्हटले होते की एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बघा आता ही वेळ आहे का? आता काही जागा रिक्त आहे का? आहे का? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सगळे टीम म्हणून काम करत आहोत. आमच्यात चांगले बॉंडिंग आहे. हे बॉंडिंग कायम राहणार आहे. कार्यकर्त्यांची भावना असते, ते बोलून जातात. मी खुर्चीसाठी लढत नाही. आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणे आहे. त्यामुळे आमच्यात चांगली बॉंडिंग आहे आणि जिथे कुठे आमच्या आमदार आणि खासदारांना जिथे कुठे त्रास असेल तिथे आम्ही आणि मुख्यमंत्री बसून चर्चा करू, असे शिंदे यांनी म्हटले आहे.