अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रेरणादायी दालन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे यांनी ही मागणी केली असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन सादर करताना आमदार प्रवीण तायडे, नगराध्यक्ष रूपाली माथने आणि सुधीर रसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या दालनाच्या माध्यमातून फुले दाम्पत्याच्या अतुलनीय कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. निवेदनानुसार, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय तसेच शेतकरी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श नागरिक, विद्यार्थी व युवकांना मिळावा, तसेच त्यांच्या कार्याची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी हे दालन उभारणे आवश्यक आहे. प्रस्तावित दालनामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याशी संबंधित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, साहित्य, प्रेरणादायी विचार, पुतळे किंवा अर्धपुतळे, डिजिटल माहिती फलक यांचा समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या कार्याची माहिती देणारे विविध उपक्रमही येथे राबवावेत, असे सुचवण्यात आले आहे. या दालनामुळे शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक वारशात भर पडेल, तसेच सामाजिक समता, शिक्षण आणि प्रबोधनाची मूल्ये अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नगरसेविका अपर्णा रोडे यांनी या दालनासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या मागणीचे सर्वत्र कौतुक होत असून, ती त्वरित पूर्ण करावी अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.
