बातमी ऐका (Marathi Voice Reader)
शहरातील वाल्मिकनगर परिसरात नाल्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २३ जून रोजी झालेल्या पावसानंतर नाला तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी थेट वस्तीत शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो. शहबाज मो. अकिल यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. निवेदनानुसार, शंकर टॉकीज परिसर, बाराभाई मोहल्ला आणि शहरातील इतर भागांमधून येणारे पावसाचे व सांडपाण्याचे प्रवाह वाल्मिक नगर येथील नाल्यात मिसळतात. मात्र नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि अतिक्रमणजन्य अडथळे साचल्याने पाण्याचा निचरा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी, नाला भरून वाहत असून त्याचे पाणी थेट वाल्मिक पुरा मोहल्ल्यात घुसत आहे. यामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक घरांसमोरील परिसरात पाण्याचे तळे साचले आहेत. दिवाण नगर आणि घंटीबाबा परिसरातील नाल्यांचा निचराही बाधित झाला असून तेथील नाल्या ब्लॉक होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांना दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव, साथीच्या रोगांचा धोका आणि मालमत्तेच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मो. शहबाज अकिल यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची नियमित साफसफाई व देखभाल झाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी याच समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असताना कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवेदनाद्वारे वाल्मिक नगर येथील नाल्याची तात्काळ साफसफाई, गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच शंकर टॉकीज, बाराभाई मोहल्ला व इतर भागांतील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवून भविष्यात वाल्मिक पुरा परिसरात पाणी घुसणार नाही, याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली आहे.