शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रक्तातील साखरेची पातळी 50 पेक्षा कमी झाल्याने हायपोग्लायसेमियाचा धोका निर्माण झाला असून अशक्तपणा, अंधारी येणे, तीव्र डोकेदुखी आणि किडनीवर परिणाम झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला असतानाही, जीव गेला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही, अशी ठाम भूमिका तुपकर यांनी घेत सरकारला इशारा दिला आहे. तुपकरांच्या समर्थनार्थ मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा: ‘गेटवे ऑफ इंडिया’वर आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न शेतकरी नेते रविकांत तुपकर त्यांची प्रकृती ढासळल्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. तुपकरांच्या समर्थनार्थ संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे धाव घेत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र, तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड केली असून, परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अकोला-हैद्राबाद हायवे रोखला, टायर पेटवले
तुपकरांची प्रकृती खालावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वाशिममध्ये शेतकरी आणि कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले. संतप्त आंदोलकांनी अकोला-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मलकापुरात संताप; शेतकऱ्यांनी स्वतःचेच साहित्य जाळले
दुसरीकडे, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत मलकापूर तालुक्यातील वाघुळ येथील शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारने शेतीचा वीज पुरवठा १२ तासांवरून ६ तासांवर आणल्याने पिके जळत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेले सिंचन साहित्य शेतातच पेटवून दिले. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान: संभाजीनगर-जालना, नाशिकसह राज्यभरात राजकीय प्रतिष्ठा पणाला; 6 आधीच बिनविरोध
राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. वाचा लाइव्ह अपडेट्स..
