गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही:वर्धापनदिनानिमित्त मुंबईत ठाकरे गटाचे पोस्टर चर्चेत, फुटीच्या पार्श्वभूमीवर दिला राजकीय संदेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि राजकीय वारशाचा पुनरुच्चार करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही!” असा मजकूर या पोस्टर्सवर झळकताना दिसत आहे. राजकीय वर्तुळात या संदेशाचा संबंध 2022 मध्ये झालेल्या आमदारांच्या बंडाशी आणि आता सहा खासदारांनी घेतलेल्या भूमिकेशी जोडला जात आहे. पक्ष फुटला, नेते बदलले, अनेक पदाधिकारी गेले, तरी शिवसेनेची मूळ विचारधारा बदललेली नाही, असा संदेश या पोस्टर्समधून देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. 60 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख वर्धापनदिनानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्स आणि होर्डिंग्जमध्ये शिवसेनेच्या सहा दशकांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाची स्थापना, मराठी अस्मितेची चळवळ, हिंदुत्वाची भूमिका आणि महाराष्ट्रातील राजकारणातील योगदान यावरही या पोस्टर्समधून प्रकाश टाकण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख चौक, रस्ते आणि पक्षाच्या शाखांजवळ हे बॅनर्स लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. फुटीनंतर कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न? गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेतील नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वर्धापनदिनाच्या निमित्ताने विचारधारेचा मुद्दा पुढे करून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि संघटना एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचाही मोठा मेळावा वर्धापनदिनाच्या दिवशीच मुख्यमंत्रीपदावरून बंड करून वेगळी शिवसेना स्थापन करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या गटाकडूनही मुंबईत मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘जनात शिवसेना, मनात शिवसेना’ अशा घोषवाक्यांसह शिंदे गटानेही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्धापनदिनाला राजकीय संघर्षाची किनार एकीकडे खासदारांच्या फुटीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, तर दुसरीकडे दोन्ही गट आपापल्या शिवसेनेलाच खरी वारसदार असल्याचे सांगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उबाठा गटाने लावलेले “गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही” हे पोस्टर केवळ वर्धापनदिनाची शुभेच्छा नसून, सध्याच्या राजकीय संघर्षाला दिलेले थेट उत्तर म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत लागलेली ही पोस्टर्स आणि त्यातून दिलेले राजकीय संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. संबंधित बातमी वाचा… ‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व’!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. वाचा संपूर्ण बातमी षण्मुखानंदमध्ये उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा:6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर आणि भाजप रडारवर?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक ‘षण्मुखानंद सभागृहात’ पार पडत आहे. ऐन वर्धापन दिनाच्या तोंडावर पक्षाच्या ६ खासदारांनी ‘व्हिप’ धुडकावून दिलेल्या हुलकावणीमुळे ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी, या संकटाचा धैर्याने सामना करत पक्षाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, राज्यभरातून निष्ठावान शिवसैनिकांचे जथ्थे मुंबईत दाखल होत आहेत. वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!