“आता पुढचा नंबर तुमच्या, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे,” असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून असा कोणताही क्रम किंवा ‘नंबर’ नसतो. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशी चर्चा करणे थांबवावे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवरही थेट निशाणा साधला. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राला भेट देण्यासाठी ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील भाजपवर टीका करताना शिंदे म्हणाले, “पाशवी बहुमत मिळवण्याच्या नादात भाजपने स्वतःच्या पक्षातील निष्ठावंतांना बाजूला सारून आयारामांना महत्त्व दिले आहे. हा त्यांचा फुग्यासारखा फुगलेला अहंकार आहे. तो कधी फुटेल हे सांगता येत नाही, हे त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.” याच मुद्द्यावर अधिक खोचक टिप्पणी करताना त्यांनी सांगितले की, “भाजपचा हा फुगा फुटल्यानंतर त्यांची सदस्यसंख्या पुन्हा दोनवर येऊ नये, एवढेच पाहावे.” बंडखोर नेत्यांना ‘वाय-झेड’ सुरक्षा का लागतेय? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या लोकसभा सदस्यांबाबतही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्या-त्या मतदारसंघांमध्ये या नेत्यांविषयी जनतेत मोठा असंतोष असल्याचा दावा करत, तो कधीही उफाळून येऊ शकतो, असे ते म्हणाले. “आता त्यांना वाय-झेड सुरक्षा घ्यावी लागत आहे, यावरून परिस्थिती समजून घ्यावी,” अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली. राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा विषय संपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गट यांच्या संभाव्य विलिनीकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हा विषय आता संपला असल्याचे सांगितले. याबाबत पुन्हा चर्चा करण्यास काही अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्हा परिषदेच्या ‘राड्याचा’ पुनरुच्चार होणार? सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असा दावा करताना शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील गोंधळाचा संदर्भही दिला. “तेव्हाचा राडा जसा दिसला, तसाच प्रत्यय निकालाच्या वेळीही येईल,” असे त्यांनी म्हटले.
