तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव आदी परिसरातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या झाडांवर वादळी वाऱ्याने कहर केला. अनेक झाडे उन्मळून पडली तर काही झाडे मधोमध मोडून जमिनीवर कोसळली. यामुळे कापणीयोग्य मालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने तसेच बँकेचे कर्ज काढून केळीची लागवड केली होती. मात्र, एका रात्रीत संपूर्ण मेहनत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी अध्यक्ष अनोख रहाणे, गजानन डाफे, विकास देशमुख, हरिभाऊ पायघन, मुकुंद अकोटकर, अभि नवले, बाळूभाऊ अकोटकर, अनिल रोकडे, राजूभाऊ बोचे, संतोष भारसाकळे, गणेश भारसाकळे, प्रदीप हुत्के, रामदास अस्वार, राजूभाऊ भुसकट, प्रवीण बेलोकार, गोपाल अकोटकर, दीपक अस्वार, अनिकेत बोचे, रवींद्र जायले, आशिष झापे, गजानन जवंजाळ, निलेश बाहाकर, चेतन झापे, गजानन बाहाकर, अंकुश झापे, शेतकरी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच पणज मंडळ परिसरातील नुकसानग्रस्त भागात अद्याप कोणताही शासकीय अधिकारी किंवा विमा कंपनीचा प्रतिनिधी पाहणीसाठी आले नसल्याची खंत व्यक्त केली.
