यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने परिसरातील १०० टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गत दोन दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने पावसाचे चक्र बदलले असून, दरवर्षी पावसाला विलंब होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होत असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी पैशांची जुळवाजुळव केली. महागडे बियाणे, खते आणि कीटकनाशकांची खरेदी करून शेतकरी सज्ज झाले आहेत, परंतु जून महिना अर्धा अधिक संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. परिसरातील शेतजमीन प्रामुख्याने काळी आणि बरड अशा दोन भागांत विभागलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिकेची सोय आहे, त्यांनी अल्प प्रमाणात कपाशीची कोरडी लागवड केली आहे. मात्र, सध्या भूजल पातळी कमालीची खालावली असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस लांबला, तर या बागायतदार शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी केवळ पहिल्याच ओल्या पावसावर पेरणीची घाई करू नये. पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय बियाणे टोबू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. दरवर्षी उशिरा येणाऱ्या पावसामुळे या पिकांचे हातचे उत्पादन जाते, असा अनुभव आहे. यावर्षीही पाऊस लांबल्याने मूग व उडदाचा पेरा लक्षणीयरीत्या कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मूग, उडीद पिकांना फटका बोरगाव मंजू परिसरात सोयाबीन आणि कपाशी या पिकांचा पेरा सर्वाधिक असतो. याशिवाय तूर, मूग, उडीद, ज्वारी आणि भाजीपाल्याचे उत्पादनही घेतले जाते. मात्र, पाऊस लांबल्याचा थेट फटका मूग आणि उडीद या नगदी पिकांच्या पेरणीला बसताना दिसत आहे. ७५ मिमी पावसानंतर पेरणी ^सलग तीन ते चार दिवस ७५ किंवा १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. खंडीत पावसाच्या शक्यतेमुळे कमी कलावधीच्या वाणांची पेरणी करावी. सरी ओरंबा पद्धतीने पेरणी करावी. पावसाचा खंड पडल्यास पाणी द्यावे. – प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी.
