20-20 वर्षे निकाल न लागणे हाही अन्यायच!:पवनराजे हत्याकांड निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावरही सूचक विधान

राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले, अशी अपेक्षा होती की ओमराजे निंबाळकरांच्या बाजूने निकाल लागेल. ते झाले नाही, आता वरच्या न्यायालयात जाता येईल. न्यायालयाची मजबूती वाढली पाहिजे. बऱ्याचवेळा निकाल न लागणे देखील अन्याय होत असतो. 20-20 वर्ष अशा खून खटल्यात निकाल लागत नसेल तर त्या व्यवस्थेत बदल केला पाहिजे. का वेळ लागतो याचे देखील संशोधन सरकारने केले पाहिजे. ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरवर काय म्हणाले बच्चू कडू? पुढे बोलताना बच्चू कडू यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फुटीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मला असे वाटते की त्यांनी निर्णय घेऊनच आले असणार. काही किंतु परंतु राहिले असतील तर मतदारसंघात जाऊन निर्णय घेतला पाहिजे. पक्षांतर होत असेल तर तिथे संख्येला फार महत्त्व आहे आणि ते महत्त्व ओळखूनच सगळा निर्णय झाला असेल. पक्षांतर कोणामार्फत झाले आहे, कोणी केले आहे, त्यांनी जबाबदारी उचलली असेल. निंबाळकरांची बैठक कोणासोबत झाली ते आता त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ओमराजे निंबाळकरांची निकालावर प्रतिक्रिया पवनराजे हत्याकांड निर्णयाचा निकाल आज आला. या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘आज लागलेला निकाल दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. तिथेही निकाल नाही मिळाला, तर पुढे सर्वोच्च न्यायालयात जावू.’ कलियुगात वाईटाला चांगले बळ ओमराजे म्हणाले की, ‘सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच न्यायालय आणि संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जावे लागेल,’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!