“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. शासकीय सवलतींचा लाभ कायम
या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहतील. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास करता येईल, तर महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून या विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे. गेल्या वर्षी एसटीने ५,२०० बसेसद्वारे २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती, यंदा त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या स्वखर्चाने १३ हजार कर्मचाऱ्यांची ‘माऊली’ सेवा
वारीदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी अशा सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. सेवाभावाने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती त्यांनी ही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. याशिवाय, एकादशीच्या दिवशी होणारी परतीची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करणार आहेत. पंढरपुरात हायटेक सोयी-सुविधांसह ४ तात्पुरती बस स्थानके
भाविकांची गर्दी विभागण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूरमध्ये चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत: या सर्व तात्पुरत्या स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून एसटी यंत्रणा यात्राकाळात अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
