राज ठाकरेंचा भाजप आणि जैन मुनींवर घणाघात:आमदार-खासदार 50-100 कोटींना विकले जातायत, राज्याची वीज अदानींच्या घशात घालण्याचा डाव

“राज्यात शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढली आहे आणि इकडे १००-५० कोटींना आमदार-खासदार विकले जात आहेत. दुसरीकडे निवडणुका आणि मतदार याद्यांमधून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक नवनवे वाद उकरून काढले जात आहेत,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी प्रशासकीय कारस्थान, मतदार याद्यांमधील घोळ, राज्याची वीज अदानींच्या हातात जाण्याची शक्यता आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले. महाराष्ट्राची वीज अदानींच्या घशात घालण्याचा डाव राज ठाकरे यांनी महावितरणच्या (MSEDCL) सद्यस्थितीवर एक अत्यंत धक्कादायक दावा केला. भारताच्या ऊर्जा मंत्रालयाने (Power Ministry) काढलेल्या एका अहवालानुसार, वीज वितरणात १०० पैकी महाराष्ट्राला केवळ १.५ गुण मिळाले आहेत. महावितरण आता लोकांमधून पैसे उभे करण्यासाठी आपला ‘आयपीओ’ (IPO) आणत आहे. पण ज्या कंपनीला १०० पैकी फक्त दीड मार्क आहे, तिथे सर्वसामान्य माणूस का गुंतवणूक करेल? तिथे फक्त अदानीच गुंतवणूक करणार. एकदा का हे अदानींच्या हातात गेले की महाराष्ट्राची वीज कोण ठरवणार, तर फक्त अदानी. उद्या हे पाणीही ताब्यात घेतील. आपण काय गुलाम आहोत का? जनतेला केवळ आंदोलनांत गुंतवून ठेवून सिस्टीम ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. जैन मुनींवर संताप: “मराठी माणसाचे मनगट पाहिलंय का?” महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा लावण्याच्या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “जैन धर्माबद्दल आम्हाला आदर आहे, पण काही जैन मुनी हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण करत आहेत. कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरणाऱ्या एकाला तर मुनीही म्हणत नाहीत. कसले पांढरे पट्टे सोसायट्यांमध्ये मारता? कधी कबुतरांचा विषय तर कधी पट्ट्यांचा विषय. आम्हाला वाद नको आहेत, पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी?” असा थेट इशारा त्यांनी दिला. हे सर्व जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांवरून वळवण्यासाठी सुरू असल्याचे ते म्हणाले. स्वाभिमान मेला की फक्त जिवंत प्रेतं उरतात देशातील भीषण वास्तव आणि राजकारण्यांची लाचारी यावर बोलताना राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. देशभरात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी, ‘नीट’चे (NEET) विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. राज्यात एवढे गंभीर प्रश्न असताना, नेते फक्त आमदार आणि खासदार फोडण्यात व्यस्त आहेत. ज्या नेत्यांना निवडून देण्यासाठी जनता चार-चार तास रांगेत उभी राहते, ते १००-५० कोटींना विकले जातात. भविष्यातील पिढ्यांना आपण काय सांगणार? आपण विकले गेलो? स्वाभिमान मेला की उरतात ती फक्त जिवंत प्रेतं. खासदारांची फूट ही अमित शहांची २०२९ ची तयारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) ६ खासदारांच्या संभाव्य फुटीवर राज ठाकरे यांनी मोठे भाकीत केले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना, शिवसेनेचे ते ६ खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? ही सगळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २०२९ च्या निवडणुकांसाठीची तयारी सुरू आहे. भाजपमध्येही सध्या प्रचंड अंतर्गत गोंधळ असून मोदींमुळे ते शांत आहेत. येत्या वर्षभरात राज्यात किंवा देशातही मोठे बदल होऊ शकतात, अशी चर्चा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. फुकट योजनांवरून सरकारला टोला लाडकी बहीण किंवा तत्सम योजनांवरून राज यांनी सरकारला खडे बोल सुनावले. “दर महिन्याला फुकट पैसे देण्यापेक्षा महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष द्या. फुकट कोणतीही गोष्ट दिल्यावर राज्य किंवा देश चालू शकत नाही.” अशा योजनांमुळे राज्याच्या इतर ठिकाणचा निधी ओरबाडला जातो आणि भविष्यातील पिढ्यांचे मोठे नुकसान होते, असे ते म्हणाले. मतदार याद्यांमधील कारस्थान ओळखा! राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आंदोलनासोबतच निवडणूक प्रक्रियेवर (SIR) लक्ष केंद्रित करण्याचे कडक आदेश दिले. ममता बॅनर्जींच्या राज्यात २७ लाख मते गाळली गेली. जनगणना अधिकाऱ्यांसोबत भाजपचे लोक फिरतात आणि हा आपला मतदार नाही हे लक्षात आल्यावर त्याची नावे वगळली जातात. मनसेने बीएलए (BLA) नेमून अधिकाऱ्यांच्या सहीने मतदार नोंदणीचे जे फॉर्म भरले होते, ते अधिकाऱ्यांनी रजिस्टरच केले नाहीत. ते टेबलखाली लपवून ठेवले गेले. हे शासकीय यंत्रणा वापरून सुरू असलेले मोठे कारस्थान आहे. “तुम्ही उत्तम आंदोलनं करता, भाषणं करता, पण तुमचे आंदोलन घरापर्यंत पोहोचते आणि ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. जर मतदारांची नावेच यादीत नसतील, तर काय चाटायच्या का त्या निवडणुका? जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा असेल, तर हाती सत्ता हवीच आणि सत्तेचा मार्ग मतदार यादीतून जातो,” असा कानमंत्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!