शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या बंडानंतर आता राजकीय संघर्षासोबतच वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अद्याप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना अत्यंत आक्रमक शब्दांत आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “जर कृष्णा आष्टीकर खरोखर उद्धव ठाकरेंसोबत असतील, तर त्यांनी उद्या स्वतःच्या वडिलांचं पिंडदान करून दाखवावं आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दाखवावेत. मग आम्ही मान्य करू की ते आमच्यासोबत आहेत. बाप तसा बेटा आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. नागेश आष्टीकरांच्या निर्णयाची कल्पना नव्हती: कृष्णा आष्टीकर दरम्यान, कृष्णा आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आपण वडिलांच्या संपर्कात नसल्याचे सांगितले होते. नागेश आष्टीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला, याची आपल्यालाही कल्पना नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, “मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे. वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.” सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृष्णा आष्टीकर यांनीही पलटवार केला. त्यांनी आरोप केला की, “सुषमा अंधारेंच्या बोलघेवडेपणामुळेच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.” तसेच, नागेश आष्टीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्हीही करत आहोत. त्यांनी हे पाऊल का उचलले, याची माहिती आम्हालाही नाही, असे ते म्हणाले. पैशांच्या आमिषामुळे पक्षांतर झाल्याच्या आरोपांनाही त्यांनी फेटाळून लावत, “आम्हाला पैशांची कोणतीही गरज नाही,” असे स्पष्ट केले. ओमराजेंबद्दल सर्वाधिक वाईट वाटतं: अंधारे यावेळी सुषमा अंधारे यांनी बंडखोर खासदारांवरही जोरदार टीका केली. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मला सर्वाधिक वाईट वाटतं. ज्याला आम्ही आपलं मानलं, ज्याच्यासाठी लढलो, तोच निघून गेला. एकदा विकलेले लोक पुन्हा पुन्हा विकले जातात. उद्या मोठी बोली लागली तर हे पुन्हा दुसरीकडे जातील.” “आम्ही ब्रँड तयार करणारे, ते फक्त भुंकणारे” शिंदे गटावर निशाणा साधताना अंधारे म्हणाल्या, “तुमच्याकडे भुंकणारे लोक असतील, पण माणसं निवडून आणणारे नाहीत. आम्ही कार्यकर्ते घडवणारे आणि ब्रँड तयार करणारे आहोत.” तसेच, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसैनिक भावुक वर्धापनदिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, “माझ्या नेतृत्वाबाबतच्या आरोपांमध्ये तथ्य वाटत असेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे,” असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे सभागृहातील अनेक शिवसैनिक भावूक झाले. सुषमा अंधारे यांच्याही डोळ्यांत अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत त्या म्हणाल्या, “आम्ही उद्धव ठाकरे यांना नेता मानलं आहे. त्यांनी पक्षप्रमुखपद सोडण्याचा विचारही करू नये. आम्ही त्यांच्यासोबत लढायला तयार आहोत.” खासदारांच्या बंडानंतर संघर्ष आणखी तीव्र शिवसेना (उबाठा)मधील सहा खासदारांच्या बंडानंतर पक्षात निर्माण झालेली अस्वस्थता आता उघड संघर्षात बदलताना दिसत आहे. एका बाजूला बंडखोर खासदार आपली भूमिका योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट त्यांच्यावर “गद्दारी”चा ठपका ठेवत आक्रमक भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत कृष्णा आष्टीकर आणि सुषमा अंधारे यांच्यातील शाब्दिक युद्धाने या राजकीय संघर्षाला आणखी नवे वळण दिले आहे.
