खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकरी अजुनही मान्सुनच्या मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुन महिन्याची २० तारीख उलटली तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेला बळीराजा चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आताच पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने मेळघाटातील अनेक गावांमध्ये पेरणीची कामे थांबलेली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, बियाण्यांची खरेदी, खतांची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करत नाहीत. मेळघाटातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. डोंगराळ भाग, दुर्गम गावे आणि मर्यादित सिंचन सुविधा यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी पावसाचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. पहिल्या दमदार पावसाच्या सरी कोसळल्या की शेतकरी आनंदाने शेताकडे धाव घेतात. मात्र,यंदा आकाशात ढग दिसत असले तरी पाऊस मात्र समाधानकारक झालेला नाही. शेत तयार आहे, बियाणे तयार आहे, फक्त पावसाची साथ हवी आहे, अशी भावना मेळघाटातील बळीराजा व्यक्त करत आहे. आता मेळघाटातील शेतकऱ्यांच्या आशा आभाळाकडे लागल्या असून, हिरवाईने नटलेल्या शेतांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पेरणी पुढे ढकलली तर उत्पादनावर परिणाम पाऊस लांबल्यास पेरणीचा कालावधी पुढे ढकलला जाण्याची आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जिल्ह्यासह मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा आहे. शेतात उभे राहणारे पीक, घरातील आनंद आणि आर्थिक आधार हा सगळा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी मनोमन प्रार्थना करत आहे की, लवकरच वरुणराजाने कृपा करावी आणि कोरड्या पडलेल्या जमिनीवर पावसाच्या सरी बरसाव्यात.कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आताच पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. जून महिना अर्ध्यावर आला असतानाही चांदूर रेल्वे तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाची सुरुवात होत असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. मात्र, यंदा आभाळात ढगांची वर्दळ दिसत असली तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतीचे संपूर्ण गणितच बिघडले आहे. चांदुर तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीसाठी आवश्यक खर्चही केला आहे. मात्र पाऊस नसल्याने पेरणी सुरू करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेरणीसाठी योग्य कालावधी हातातून निघून जात असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
