महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष 1958 नंतर म्हणजेच तब्बल 68 वर्षांनी जूनचा पहिला पंधरवडा पूर्णपणे कोरडा जाण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे शहरावरील पाणीसंकट कमालीचे तीव्र झाले आहे. राज्यभरातच पावसाची कमालीची तूट राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पावसाची तूट कमालीची वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक तूट रायगड उणे 99% आणि मुंबई शहर उणे 98% इतकी नोंदवली गेली आहे. याशिवाय मुंबई उपनगर उणे 96%, सातारा उणे 90%, अहिल्यानगर उणे 88%, संभाजीनगर उणे 87%, रत्नागिरी उणे 84%, पुणे उणे 83%, सिंधुदुर्ग व कोल्हापूर उणे 80%, सांगली उणे 56% आणि सोलापूर जिल्ह्यात उणे 52% पावसाची तूट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अद्याप मोसमी वारे पोहोचलेले नाहीत. राज्यात अवर्षणाचे सावट; जून महिन्यात मोसमी पावसाची तब्बल 81 टक्के तूट मान्सून आगमन झाले असले, तरी दमदार पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण राज्यात अवर्षणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याचा निम्मा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 1 जून ते 20 जून या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल उणे 81 टक्के इतका अत्यंत कमी पाऊस झाला आहे. मान्सून पोहोचलेल्या जिल्ह्यांत अद्याप कोरडीठाक परिस्थिती कायम आहे. लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता- अनुपम कश्यप आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख व हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यप यांच्या मते, महाराष्ट्र आणि लगतच्या भागात कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. लवकरच मान्सूनचा प्रवाह पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, शेजारील केरळममध्ये उणे 24%, कर्नाटकात उणे 37% तर गोव्यात उणे 73% पावसाची तूट आहे. येत्या 23 जूनच्या आसपास मान्सून पुन्हा सक्रिय होऊन तेलंगण, बिहार, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांतून पुढे सरकेल. 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनची महाराष्ट्रात झेप : खुळे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की,तब्बल 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात घेतलेली झेप, विशेषतः अलिबाग, पुणे, सातारा आणि मराठवाड्यापर्यंत झालेली वाटचाल बळीराजासाठी नक्कीच सुखावणारी आहे. अरबी समुद्रातील अनुकूल बदल आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला मिळालेली नवी बळकटी यामुळे मुंबईतही पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस दाखल होईल, हा आशादायी अंदाज मनाला उभारी देतो. मात्र, दुसरीकडे विदर्भात 26 जूनपर्यंत राहणारा रात्रीचा उकाडा व उष्णतेची तीव्र लाट चिंतेची बाब असून, तेथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो, असेही खुळे यांनी सांगितले. पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा घटल्याने पाणीपुरवठ्याचे संकट महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले की, धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून पुण्यातील धरणांमध्ये केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याने एक दिवसाआड पाणी कपात करण्यात आलेली आहे. पाणी टँकरचे प्रमाणदेखील मागील एक आठवड्यापासून वाढलेले असून सध्या एकूण 1665 पाणी टँकर शहरात कार्यरत आहे. पुण्याची तहान भागवणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. ऐतिहासिक आकडेवारी आणि भूतकाळातील स्थिती हवामान विभागाच्या नोंदीनुसार, यापूर्वी 1915 आणि 1932 मध्येही 20 जूनपर्यंत पुण्यात अशीच कोरडी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धात मान्सून सक्रिय झाला होता आणि चांगला पाऊस पडला होता. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, जून महिन्यात 1915 मध्ये एकूण 362 मिमी, 1932 मध्ये 79 मिमी आणि 1958 मध्ये 65 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. यंदा मात्र “एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून कमालीचा कमकुवत झाला असून, वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना भीषण उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे वीज आणि पाण्याची मागणी कमालीची वाढली आहे. दुसऱ्या बाजूला पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस आणि भात यांसारख्या खरीप पिकांची पेरणी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
