कवठा कडू आमसभेत गोंधळ; आरोपांनी तापले वातावरण:ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर भडीमार, उत्तरांअभावी संताप अनावर

तालुक्यातील कवठा कडू ग्रामपंचायतीच्या ५ जून रोजी आयोजित आमसभेत विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जाब विचारला. मात्र, अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने वातावरण चांगलेच तापले आणि काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात प्रत्यक्षात एकच सार्वजनिक शौचालय असताना ग्रामपंचायतीच्या नोंदीत तीन सार्वजनिक शौचालये दाखवल्याचा आरोप केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी मशीन खरेदीसाठी खर्च दाखवला असला तरी प्रत्यक्षात अशी मशीन गावात उपलब्ध नसल्याचा दावा केला. याशिवाय व्यायामशाळेसाठी खरेदी केलेल्या साहित्यामध्येही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेष म्हणजे कवठा कडू गावातील विकासकामांचे लोकेशन नोंदीत कुऱ्हा गावात दाखवल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित केला. अवघ्या ५०० रुपयांची पाण्याची कॅन जास्त दराने खरेदी केल्याचे दाखवून निधीचा अपव्यय केल्याचा आरोप केला. सभेदरम्यान ग्रामस्थांनी विविध कागदपत्रांचा आधार घेत प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, संबंधितांकडून स्पष्ट, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नागरिकांचा संताप वाढला. काही वेळ सभेत जोरदार शाब्दिक वादावादी झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली असून, ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी गावातून पुढे येत आहे. “ग्रामसभेत उपस्थित झालेल्या आरोपांची चौकशी होणार का ? आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रशासन उत्तर देणार का ?” याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. ^”आमसभेत आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सतत टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील संशय अधिक वाढला आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि सार्वजनिक निधीचा हिशोब नागरिकांसमोर मांडावा.” किशोर कडू, ग्रामस्थ, कवठा कडू. कवठा कडू येथील ग्रामपंचायत भवन उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याने संशय बळावला

Leave a Comment

error: Content is protected !!