मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे अंतर पार केले. हे गिधाड नुकतेच राजस्थानमधील प्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले. या गिधाडाचा जन्म कृत्रिम पैदास केंद्रात झाला होता. 2 जानेवारी 2026 रोजी तिला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातून निसर्गात सोडण्यात आले. सुरुवातीचे चार महिने तिने मेळघाटच्या परिसरात राहून नैसर्गिक वातावरणाचा सराव केला. त्यानंतर 28 मे रोजी तिने मेळघाट सोडले आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान या तीन राज्यांतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान तिने सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि चित्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुनो नॅशनल पार्कलाही भेट दिली. बॉम्बे नॅशनल हिस्टरी सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांनी या घटनेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, या गिधाडाने कोणत्याही मानवी मदतीशिवाय जंगलात स्वतःचे अन्न शोधून स्वतःला जिवंत ठेवले. यामुळे कृत्रिम पैदास केंद्रातील गिधाडेही निसर्गात यशस्वीपणे जगू शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच, या गिधाडाने प्रवासासाठी केवळ व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलांचा मार्ग निवडला, कारण अशा ठिकाणी वाघ-बिबट्यांच्या शिकारीमुळे त्यांना सहजपणे अन्न उपलब्ध होते. या गिधाडांच्या पाठीवर सौरऊर्जेवर चालणारे आधुनिक टॅग आणि पायात निळ्या रंगाची रिंग लावण्यात आली आहे. या उपकरणांच्या मदतीने बीएनएसचे शास्त्रज्ञ त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. भारताच्या गिधाड संवर्धन कार्यक्रमासाठी हा प्रवास एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.
