अकरावी तिसऱ्या फेरी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस:जिल्ह्यात 31,367 जागा अजूनही रिक्त

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, २५ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही ३१,३६७ जागा रिक्त असून, एकूण ४३,११० प्रवेश क्षमतेपैकी २० जूनपर्यंत केवळ ११,७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी २० जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आली. या विद्यार्थ्यांना आज सायंकाळपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. तिसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर, २७ जूनपासून चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यावर्षी अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येत नाही. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित यंत्रणेने अलॉट केलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८,५७० जागा आहेत, तर कला शाखेच्या १८,३०० आणि वाणिज्य शाखेच्या ६,२४० जागा आहेत. २० जूनपर्यंतच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये विज्ञान शाखेत ७,११९, कला शाखेत ३,८०५ आणि वाणिज्य शाखेत केवळ ८१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या आकडेवारीनुसार, विज्ञान शाखेत ११,४५१, कला शाखेत १४,४९५ आणि वाणिज्य शाखेत ५,४२१ जागा रिक्त आहेत. एकूण ३१,३६७ जागा अद्याप रिकाम्या आहेत. तिसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर, शनिवार, २७ जूनपासून चौथ्या फेरीचा प्रारंभ होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!