गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, शुक्रवारी रात्री, शनिवारी दुपारनंतर अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या मुळे जिल्ह्यात २२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, खरिपाच्या पेरण्यांना वेग आला . काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळाले असून, तर नेर तालुक्यातील मोझर येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राळेगाव, आर्णी, कळंब, नेर, यवतमाळ, दारव्हा तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. नेर तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे मोझर गावालगतचा नाला दुथडी भरून वाहू लागला. परिणामी गावातील काही भागात पाणी शिरून पूरसदृश स्थिती निर्माण झाली. जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. अनेक ठिकाणी जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर लागवडीला वेग आला. शहरासह परिसरातही जोरदार सरी कोसळल्या. काही भागात यापूर्वी पेरलेली पिके उगवणीच्या अवस्थेत असून, या पावसामुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली. हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला . त्यामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला आहे. विजेमुळे बैलाचा मृत्यू पांढरकवडा तालुक्यातील भाडऊमरी शिवारात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या वेळी शेतकरी जयराम वसंता किनाके यांच्या शेतात वीज कोसळून बांधलेला बैल जागीच दगावला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, घटनेच्या पंचनाम्याची मागणी केली आहे.
